बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आलाय. बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 20, 2014, 11:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आलाय. बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय.
मृत्यूपत्रानुसार बाळासाहेंबांची मालमत्ता एकूण मालमत्ता १४.८६ कोटी रुपयांची दाखवण्यात आली आहे. मात्र ही सर्व मालमत्ता बाळासाहेब एकट्या उद्धव ठाकरेंच्या नावावर करणं अशक्य असल्याचं जयदेव यांचं म्हणणंय. तसंच वांद्रेतल्या मातोश्री बंगल्याची किंमत बाजारभावानुसार ४० कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा जयदेव ठाकरेंनी केलाय. या व्यतिरिक्त बाळासाहेबांची मुंबई आणि मुंबईबाहेरही कोट्यवधींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्याचा उल्लेखच मृत्यूपत्रात केला नसल्याचा दावाही जयदेव यांनी केलाय.
१३ डिसेंबर २०११ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी आपलं मृत्यूपत्र बनवलं. मात्र या काळात ते आजारी असल्यानं मृत्यूपत्र बनवण्याच्या स्थितीत नसल्याचं जयदेव यांचं म्हणणंय. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी हे मृत्यूपत्र कोर्टात सादर करण्यात आलं. मात्र कोर्टानं आता या मृत्यूपत्राबाबत नातेवाईकांककडून हरकती मागवल्या आहेत. त्यावर जयदेव ठाकरेंनी आक्षेप नोंदवल्यानं बाळासाहेबांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झालाय. निवडणुकीच्या चिन्हावर हा वाद चिघळण्याचे चिन्ह आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.