राज ठाकरेंच्या भेटीचे टाटांचे ‘राज’ काय ?

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Updated: Mar 8, 2013, 05:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘टाटांच्या भेटीचे राज काय ?’ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रतन टाटा आणि ठाकरे कुटुंबिय यांच्यात याआधीही मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. याआधी अनेक वेळा रतन टाटा हे बाळासाहेब ठाकरेंची भेट घेत असे. बाळासाहेबांच्या निधनापूर्वीच काही दिवस अगोदर रतन टाटांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरें यांचीही भेट घेतली होती. मात्र आता राज ठाकरे यांचे राजकारणातील वाढतं वजन पाहता ही फक्त सदिच्छा भेट आहे की, त्यामागे आणखीही काही हेतू आहे? हे स्पष्ट झालेलं नसलं तरीही या भेटीविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे.
ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी रतन टाटांचे कौतुकही अनेकवेळा केलं आहे. हे पाहता या भेटी मागचं नक्की काय राजकारण आहे ह्याबाबत चर्चा होत आहे. यातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच मुंबई महापालिका निवडणुकांनतर रतन टाटांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहलं होतं. मनसेने निवडणुकांमध्ये मिळवलेलं यश याबाबत त्यांनी राज ठाकरेचं कौतुक केलं होतं.

आज या निकालाना एक वर्ष झालं आहे. आणि या वर्षभरानंतर राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्यामध्ये झालेली ही सदिच्छा भेट एक उत्सुकतेचा विषय आहे. एकूणच या भेटीमागे नक्की काय ‘राज’ आहे, दुसरं काही राजकारण आहे का? की राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात वाढतं वजन यामुळे ही भेट आहे का, की त्यामागे दुसरा काही हेतू का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.