भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी मुकाबला ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यालाच सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

Updated: Mar 26, 2016, 07:08 PM IST
भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी मुकाबला ? title=

मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यालाच सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

या मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर त्यांना सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळावं लागण्याची दाट शक्यता आहे. 

दुसऱ्या ग्रुपमधल्या आपल्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशला धूळ चारली. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड चार पैकी चार मॅच जिंकली आहे, त्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया मॅचचा निकाल काहीही लागला तरी न्यूझीलंड या ग्रुपच्या एक नंबरवर कायम राहणार आहे. तर भारत किंवा ऑस्ट्रेलियापैकी जो मॅच जिंकेल तो या ग्रुपमधून क्वालिफाय होणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश असेल. 

तर पहिल्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज 3 मॅचमध्ये 3 विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. त्यांच्या ग्रुपमधल्या इतर टीमवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचा संघ या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर शेवटपर्यंत कायम राहील हे जवळपास निश्चीत झालं आहे. 

पहिल्या ग्रुपमधला एक नंबरचा संघ विरुद्ध दुसऱ्या ग्रुपचा दोन नंबरचा संघ असा सेमी फायनलचा मुकाबला रंगणार आहे, त्यामुळे मोठे उलटफेर झाले नाहीत तर भारत किंवा ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजशी सामना करावा लागेल. 

तर न्यूझीलंड मात्र सेमी फायनलमध्ये कोणाबरोबर खेळणार याबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे. कारण पहिल्या ग्रुपमधल्या इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला अजूनही सेमी फायनलमध्ये क्वालिफाय व्हायची संधी आहे. या तीनपैकी एका टीमविरुद्ध किवींना सेमी फायनल खेळावी लागेल.