पूनम राऊतचं शतक पाण्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव

पूनम राऊतचं शानदार शतक आणि मिथाली राजच्या अर्धशतकानंतरही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

Updated: Jul 12, 2017, 10:14 PM IST
पूनम राऊतचं शतक पाण्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव  title=
फोटो सौजन्या : आयसीसी

लंडन : पूनम राऊतचं शानदार शतक आणि मिथाली राजच्या अर्धशतकानंतरही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे. २२७ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ४५.१ ओव्हर आणि आठ विकेट राखून पार केलं.

ऑस्ट्रेलियाच्या लॅनिंगनं नाबाद ७६ आणि पेरीनं नाबाद ६० धावा करून ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. त्याआधी ओपनर बॉल्टननं ३६ आणि मूनीनं ४५ धावा करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजी आमंत्रण दिले. भारताने सुरूवातील स्मृती मनधानाची विकेट गमावल्यानंतर सावध फलंदाजी केली.  पूनम राऊत आणि मिथाली राज यांनी १५७ धावांची भागीदारी करत भारताला आश्वासक धावसंख्येकडे नेले.  पूनम राऊत याने आपल्या कारर्किदीतील आणि वर्ल्ड कपमधील पहिले शतक झळकावले. तीने १३६ चेंडूत ११ चौकारांसह १०६ धावा केल्या. तिची ही सर्वोत्तम धावा संख्या आहे. तर  मिथाली राजने  ११४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारसह ६९ धावा काढल्या.

भारताविरुद्धच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सहा मॅचपैकी पाच मॅच जिंकून ऑस्ट्रेलियानं १० पॉईंट्सची कमाई केली आहे. तर भारताने सहा मॅचमध्ये ४ विजय मिळवत आठ पॉईंट्स कमावले आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता भारताला न्यूझीलंडला हरवावं लागणार आहे.