T20 World Cup | रविंद्र जडेजाचा प्लॅन ठरला हीट; स्कॉटलॅंडला झाली पळता भुई थोडी...

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये स्कॉटलॅंड विरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी केली

Updated: Nov 6, 2021, 08:18 AM IST
T20 World Cup | रविंद्र जडेजाचा प्लॅन ठरला हीट; स्कॉटलॅंडला झाली पळता भुई थोडी... title=

दुबई : टीम इंडियाचा डावखुरा स्पिनर रविंद्र जडेजाने खुलासा केला की, दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ग्रुप 2 सामन्यात गोलंदाजांनी योग्य एरियात गोलंदाजी केल्याने स्कॉटलँडला 85 धावांवर गुंडाळता आले. भारताने अफगानिस्तान आणि न्युझीलँडच्या तुलनेत आपला रनरेट सुधारत 81 चेंडू शिल्लक ठेवत स्कॉटलँडवर 8 विकेटने विजय संपादन केला.

जडेजाच्या या प्लॅनने मिळाला विजय
रविंद्र जडेजाने सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की, आम्ही योग्य एरियात गोलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रीत करीत होतो. कारण ऑड ग्रिपिंग, टर्निंग आणि स्पिनिंग होती. स्पिनर किंवा वेगवान गोलंदाजांसाठी योग्य लाईन - लेन्थवर गोलंदाजी करणे महत्वाचे होते. 

जडेजाची महत्वाची भूमिका 
गोलंदाजी मिळताच मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवाव्यात हे ध्येय होते. त्याप्रमाणे नियोजन यशस्वी झाले. असे जडेजाने म्हटले. या सामन्यात जडेजाने एकूण 4 षटकांमध्ये 3 बळी घेत फक्त 15 धावा दिल्या. 

T20 World Cup भारताचा स्कॉटलंडवर मोठा विजय
आपला 33 वा विजय साजरा करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) टीम इंडियाने (Team India) विजयाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा (Scotland) 8 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये (T20 World Cup Semifinal) पोहचण्याची आशा जिवंत ठेवली आहे. स्कॉटलंडने भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं लक्ष ठेवलं होतं.

भारताची धडाकेबाज फलंदाजी
भारताला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. हेच लक्ष्य समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलने (KL Rahul) पहिल्या षटकापासूनच धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 5 षटकात 70 धावांची पार्टनरशिप केली.

रोहित शर्मा 30 धावांवर बाद झाला त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 30 धावा केल्या. तर केएल राहुल 50 धावांवर बाद झाला. अवघ्या 19 चेंडूत राहुलने 3 षटकार आणि 6 चौकार मारत वेगवान अर्धशतक ठोकलं

यानंतर विराट कोहली आणि सुर्याकुमारने 7व्या षटकात भारताचा विजय साकारला . सुर्यकुमारने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं

विराट ठरला टॉस का बॉस

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज टॉस का बॉस (Virat Kohli Win Toss) ठरला. टॉस जिंकत विराट कोहलीने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच गारद झाला. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने विकेट घेत स्कॉटलंडला पहिला दणका दिला.

जडेजा, शमीचा दणका
यानंतर भारतीय गोलंदाजीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमीने (Mohammad Shami) प्रत्येकी तीन विकेट घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर फार काळ टिकू दिलं नाही. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2 तर आर अश्विनने 1 विकेट घेत त्यांचा चांगली साथ दिली.

स्कॉटलंडला एका षटकात तीन धक्के
सामन्याच्या सतराव्या षटकामध्ये स्कॉटलंडला लागोपाठ तीन धक्के बसले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने मॅकलिओडची (16) दांडी गुल केली. तर पुढच्याच चेंडूवर शरीफ रनआऊट झाला. यानंतर तिसरा चेंडू शमीने यॉर्कर टाकत अलास्डेअर इव्हान्सची दांडी गूल केली. सतराव्या षटकातच स्कॉटलंडची अवस्था 9 विकेटवर 83 रन्स अशी झाली होती. 18व्या षटकात स्कॉटलंडचा संघ 85 धावांवर ऑलआऊट झाला.