चौथ्या वनडेमध्येही भारताचाच विजय

श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे भारतानं तब्बल १६८ रन्सनी विजय मिळवला आहे.

Updated: Aug 31, 2017, 09:58 PM IST
चौथ्या वनडेमध्येही भारताचाच विजय title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे भारतानं तब्बल १६८ रन्सनी विजय मिळवला आहे. ३७५ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २०७ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर शार्दुल ठाकूर, अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. श्रीलंकेच्या अॅन्जेलो मॅथ्यूजनं सर्वाधिक ७० रन्स केल्या.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर शिखर धवन फक्त ६ रन्स करून माघारी परतला. पण त्यानंतर विराट कोहलीनं ९६ बॉल्समध्ये १३१ धावा केल्या तर रोहित शर्मानं ८८ बॉल्समध्ये १०४ धावा केल्या. विराटच्या खेळीमध्ये १७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता आणि रोहितनं ११ फोर आणि ३ सिक्स मारले.

विराट आणि रोहित आऊट झाल्यानंतर मनिष पांडे आणि धोनीनंही चांगली खेळी करून भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं, मनिष पांडेनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ५० धावा केल्या तर धोनीनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ४९ धावा केल्या. पाच वनडेच्या या सीरिजमधल्या चारही वनडे भारतानं जिंकल्या आहेत.

विराट कोहलीचं हे वनडेमधलं २९वं शतक होतं तर रोहितचं १३वं शतक होतं. रोहितची हे लागोपाठ दुसरं शतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडेमध्ये सचिनची ४९, पॉटिंगची ३० शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पॉटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८५ इनिंगमध्येच २९ शतकं पूर्ण केली आहेत.