पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..

Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 28, 2024, 01:42 PM IST
पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन.. title=
पती पत्नीमधील वादानंतर पत्नीने सोडलं घर (प्रातिनिधिक फोटो सौजन्य - फ्रीपिक)

Wife Husband Fight Over Instagram Reels: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, असं म्हटलं जातं. हल्लीच्या स्मार्टफोनच्या जगामध्ये तळहातावरील या पाच इंचाच्या स्क्रीनवर जग सामावलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेटचा प्रसार अगदी छोट्यामोठ्या गावांमध्येही झाला आहे. त्यामुळेच डिजीटलायझेशनचे चांगले वाईट परिणाम आता खेडेगावांमध्येही दिसून येत आहे. हल्ली रिल्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून या छोट्या शहर आणि गावांमधूनही कंटेट क्रिएटर्स समोर येत आहेत. असं असतानाच बिहारमधील एका गावात मात्र अगदीच विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका महिलेने तिचा पती तिला सोशल मीडियावर रिल्स बनू देत नाही म्हणून चक्क घर सोडून निघून गेली आहे. या प्रकरणी आता पतीने तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उजेडात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

बिहारमधील जमुई तालुक्यातील छोट्याश्या गावात राहणार जितेंद्र हा त्याच्या पत्नीच्या सोशल मीडियाच्या व्यसनाला वैतागला होता. जितेंद्रची पत्नी तमन्ना प्रवीण ही एवढ्या जास्त प्रमाणात सोशल मीडिया वापरते की तिच्या या व्यसनाला कंटाळून पतीने तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी तंबी दिली आणि हे असलं काही यापुढे चालणार नाही असं सांगितलं. मात्र पतीने भरलेला हा दम तमन्नाला फारसा आवडला नाही. तमन्नाने पतीच्या या धमकी वजा इशाऱ्यानंतर त्याच्या न कळत आपल्या मुलीला घेऊन थेट घरच सोडलं. खरं तर जितेंद्र आणि तमन्नाचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. हे दोघे 2017 साली एका कोचिंग क्लासमध्ये भेटले. दोघेही प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. 

सोशल मीडियामुळे मिठाचा खडा

लग्नानंतर जितेंद्र आणि तमन्ना हे जितेंद्रच्या आई-वडिलांच्या घरीच एकत्र कुटुंबात राहू लागले. तमन्नाने आपलं नाव बदलून सीमा असं करुन घेतलं. लग्नानंतर बराच काळ दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. दोघांना एक मुलगीही झाली. मात्र कामानिमित्त जितेंद्र दुसऱ्या शहरात राहू लागला आणि या दोघांच्या संसारात मीठाचा खडा पडला.

10 हजारहून अधिक फॉलोअर्स

जितेंद्र एका धागे बनवण्याच्या कंपनीत काम करण्यासाठी बंगळुरुला शिफ्ट झाला तर त्याची पत्नी तमन्ना बिहारमध्ये सासरच्या घरीच थांबली. जितेंद्र कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यानंतर तमन्नाचा सोशल मीडियावरील वावर वाढला. ती इन्स्टाग्रामवर रिल्स बनवू लागली. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही या रिल्समुळे अल्पवधीत वाढली. इन्स्टाग्रामवर तमन्नाच्या अकाऊंटवरुन 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले तर फेसबुकवर तिचे 6 हजारांहून अधिक फ्रेण्ड्स झाले. 

मंदिरात जाते सांगून निघून गेली

मात्र तमन्नाचा सोशल मीडियावरील हा कंटेट पती रविंद्रला फारसा आवडला नाही. त्याने अनेकदा आपली नापसंती बोलून दाखवली. त्याने अनेकदा सांगूनही फरक न पडल्याने त्याने पत्नीला यापुढे सोशल मीडियाचा वापर करायचा नाही अशी तंबीच दिली. दोघांमध्ये सोशल मीडियाच्या वापरावरुन वरचेवर अनेकदा खटके उडू लागले. मात्र रविंद्र पत्नीला आणि घरच्यांना भेटण्यासाठी परतला तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडणं झालं. 20 मे रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर तमन्ना मुलीला घेऊन मंदिरात जातेय सांगून गेली तरी परतलीच नाही. 

पोलिसांकडे तक्रार केली पण...

या प्रकरणी रविंद्रने घरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी रविंद्रने लेखी तक्रार न देता तोंडीच आपली तक्रार सांगितली असून लेखी तक्रार दिल्यानंतरच कारवाई करता येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.