कल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्रीपुलाचं उद्घाटन

थ्रीडी चष्मे घालून पाहण्यात आला पत्रीपूल

Updated: Mar 8, 2020, 06:39 PM IST
कल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्रीपुलाचं उद्घाटन title=
फाईल फोटो

कल्याण : सांगितलेल्या मुदतीत पत्रीपूलाचे काम पूर्ण न झाल्याबद्दल रविवारी कल्याण शहर मनसेतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. काळे फुगे, जोडीला फटाके आणि जोरदार निषेधाच्या घोषणाबाजीमध्ये मनसेने अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन केलं. 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये पत्रीपुल पूर्ण होण्याचे आश्वासन शिवसेनेतर्फे देण्यात आलं होतं. मात्र त्याची मुदत उलटूनही अद्याप पत्रीपुल सुरू झाला नसल्याने कल्याण शहर मनसेने रविवारी उपहासात्मक आंदोलन केलं. पत्रीपुलाच्या गर्डरला जागोजागी निषेधाचे काळे फुगे, आश्वासन पूर्ती न झाल्याबाबतचे फलक दिसत होते. तर मनसेने श्रीफळ वाढवत या अदृश्य पत्रीपुलाचं उद्घाटन केलं. हा अदृश्य पूल पाहता यावा यासाठी विशेष ३डी चष्मेही घालण्यात आले होते.

मनसे शहराध्यक्ष विनोद केणे आणि विभाग अध्यक्ष कपिल पवार यांच्या संकल्पनेतून निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. तर पालकमंत्री, खासदार, आमदार आणि महापालिकेमध्ये सत्ता असूनही शिवसेना एवढा महत्वाचा पूल बनवण्यात अपयशी ठरल्याची टिका मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केली.

कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येण्याबाबत सांगण्यात आलं होतं. तसंच पत्री पुलाच्या गर्डरचं काम ५० टक्के पू्र्ण झालं असून गर्डर तयार करण्याचं काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु असल्याचंही माहिती देण्यात आली होती. मात्र, अद्यापही पत्री पूल सुरु करण्यात आलेला नाही. 

गेल्यावर्षी १०४ वर्ष ऐतिहासिक पत्रीपूल पाडण्यात आला होता. त्यानंतर या मार्गावरून वाहनं चालवणं फार जिकरीचं झालं आहे. एकच उड्डाणपूल असल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न फार गंभीर होत आहे. परिणामी पत्रीपूल होणार कधी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.