हिंसक जमावाच्या हल्ल्यात ३०० मगरींचा मृत्यू

मृत व्यक्ती आपल्या प्राण्यांसाठी चारा शोधण्यासाठी शेतात गेला होता...

Updated: Jul 17, 2018, 12:48 PM IST
हिंसक जमावाच्या हल्ल्यात ३०० मगरींचा मृत्यू  title=

सोरोंग : इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मगरींच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हिंसक जमावानं तब्बल ३०० मगरींचा खात्मा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पापुआ प्रांतात घडली. 

मृत व्यक्ती आपल्या प्राण्यांसाठी चारा शोधण्यासाठी शेतात गेला होता... तिथंच मगरींनी त्याच्यावर हल्ला केला. या व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी जमा झालेल्या जमावानं विधी पार पडल्यानंतर जमावानं मगरींवर हल्ला करत त्यांच्या खात्मा केला. 

रहिवासी भागाजवळच मगरींचं 'फार्म' असल्यानं रहिवासी संतप्त होते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर सगळे रहिवासी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले. स्थानिक संरक्षण एजन्सीचे प्रमुख बसर मनुलांग यांनी त्यांना 'फार्म' नुकसान भरपाई देण्यास तयार असल्याचं सांगितलं. 

यामुळे नाराज झालेले रहिवासी चाकू, खुरपं घेऊन 'फार्म'मध्ये दाखल झाले... आणि ४ इंच लांबीच्या मगरींच्या पिल्लापासून ते दोन मीटर लांबपर्यंतच्या जवळपास ३०० मगरींना या जमावानं ठार केलं. या जमावाला थांबवणं अशक्य होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय.