बिलावल भुट्टो झरदारी भारत येणार, 12 वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा

Bilawal Bhutto Will Visit India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. मात्र, असे असताना आता भारत दौऱ्यावर पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भारत दौऱ्याबाबत उत्सुकता आहे.

Updated: Apr 21, 2023, 11:52 AM IST
बिलावल भुट्टो झरदारी भारत येणार, 12 वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा title=

Bilawal Bhutto Will Visit India : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी  जुलै 2011 मध्ये हिना रब्बानी खार यांनी भेट दिली होती. त्याही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. तसेच 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ नवी दिल्लीत आले होते. आता बिलावल येत असल्याने त्यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे.

गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  4 आणि 5 मे रोजी ही बैठक होणार आहे.  पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या माहितीनुसार ते पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ही माहिती दिली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारताला भेट देणारे बिलावल हे पहिले परराष्ट्र मंत्री असतील.  

2014 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी नवी दिल्लीत आले होते, तेव्हापासून कोणताही प्रमुख पाकिस्तानी नेता भारतात आलेला नाही. भारताने पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना परराष्ट्र मंत्री आणि SCO च्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी SCO चे पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भारत-पाकिस्तान संबंध अतिशय नाजूक अवस्थेत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर भारत-पाक संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. ऑगस्ट 2019 नंतर भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर परिस्थिती आणखीनच तणाव वाढला आहे.

भारताकडे SCO चे अध्यक्षपद आहे. SCO चे सध्याचे अध्यक्ष आठ सदस्यीय संघटनांचे आहेत. भारत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. SCO सदस्य देशांमध्ये भारत, रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.