Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा

Train Accident Death Sentence To Railway Minister: या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 172 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं. घटनास्थळावरही नवीन रेल्वेमंत्रीच गेले होते हे विशेष.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 7, 2023, 05:30 PM IST
Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा title=
या अपघातामध्ये 172 जण जखमी झाले (फोटो - रॉयटर्स)

Death Sentence To Railway Minister: ओडिशामधील बालासोरमध्ये शुक्रवारी (2 जून 2022 रोजी) झालेल्या ट्रेनच्या तिहेरी अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात मागील अडीच दशकांहून अधिक काळात भारतामध्ये झालेल्या सर्वात मोठा रेल्वे अपघात ठरला. या अपघातामध्ये 1100 हून प्रवासी जखमी झाले आहेत. 275 मृतांपैकी 100 हून अधिक प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. यावरुनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज बांधता येईल. या अपघाताचा आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआयकडून तपास केला जात आहे. सीबीआयच्या टीमने घटनास्थळी जाऊन पहाणीही केली आहे. सध्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जात असून अपघात नेमका कसा घडला याचा शोध घेतला जात आहे.

लगेच रेल्वेमंत्र्यांना केलं सस्पेंड, अपघात स्थळी पोहोचले नवे रेल्वेमंत्री

मात्र ज्याप्रकारे ओडिशामधील बालासोरमध्ये अपघात घडला तसाच अपघात 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये चीनमध्ये घडलेला. या अपघातानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री तसेच 2 अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. चीनमधील वेनजुओ शहरामध्ये दोन हाय-स्पीड ट्रेन प्रचंड वेगात एकमेकांना धडकल्या. या अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू झाला. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार या अपघातात 172 प्रवासी जखमी झाले. अपघाताची बातमी समोर आल्यानंतर तातडीने चीनच्या रेल्वेमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं. नव्याने नियुक्त करण्यात आलेले रेल्वेमंत्री तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मदतकार्य करण्यात आलं. या अपघाताची चौकशी करण्यात आली. 

थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली

रेल्वेची सिग्लन सिस्टीम फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याचं रेल्वे अपघातासंदर्भातील चौकशीमध्ये स्पष्ट झालं. सिग्नल सिस्टीमचं कंत्राट देण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता असंही तपासात समोर आलं. म्हणजेच रेल्वेमंत्र्यांपासून रेल्वे अधिकाऱ्यांनीही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं नाही असा ठपका तपासादरम्यान ठेवण्यात आला. रेल्वेचे अधिकारी तसेच मंत्र्यांच्या गैरजबाबदार वागणुकीमुळे 40 प्रवाशांना त्यांचा काही दोष नसतानाही प्राण गमावावे लागले. हे प्रकरण नंतर कोर्टासमोर गेल्यानंतर अपघात झाला त्यावेळी मंत्री असलेल्या लियु झिजुन यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. बीजिंगमधील कोर्टाने लियु जिजुन यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. रेल्वे मंत्री लियु झिजुन यांच्याबरोबरच रेल्वे मंत्रालयातील प्रमुख अभियंता झांग शुगआंग आणि चायना रेल्वे सिग्नल कम्युनिकेशन कॉर्पच्या बोर्डाचे अध्यक्ष मा चेंग यांना या रेल्वे अपघातासाठी दोषी ठरवण्यात आळं. रेल्वेच्या या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. 

नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

आधी पद गेलं मग पक्षानेही केली हकालपट्टी

लियु झिजुन यांच्याविरोधात 25 वर्षांमध्ये 1 कोटी डॉलर्सचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच लियु झिजुन यांनी वेगवेगळ्या 11 प्रकरणांमध्ये लाच घेऊन रेल्वेची कंत्राटं मिळवून देण्यास मदत केल्याचाही आरोप सिद्ध जाला. चीनच्या राजकारणामधील एक प्रभावी नेता अशी ओळख असलेल्या लियु झिजुन यांना तातडीने पदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर त्यांना कम्युनिस्ट पार्टीमधून निलंबित करण्यात आलं. मार्च 2013 मध्ये चीनने रेल्वे मंत्रालय बंद केलं. रेल्वे मंत्रालयासंदर्भातील ऑडिटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

नक्की वाचा >> Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 275 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेला देश

लियु झिजुन यांच्याकडे 2003 साली चीनच्या रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वेचं देशातील जाळं वाढवणारे अनेक निर्णय़ घेतले. यामुळे चीनमध्ये कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली. जगातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेला देश म्हणून चीनकडे पाहिलं जाते. मात्र चीनमधील रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. 14 डिसेंबर 2015 रोजी लियु झिजुन यांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कमी करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सध्या ते तुरुंगातच आहेत.