विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुलगुरुंशी चर्चा करणार

Updated: May 29, 2020, 02:31 PM IST
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची बैठक title=

मुंबई :  राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पदवी प्रदान करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती. असे पत्र लिहिल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्याची दखल घेऊन उच्च शिक्षणमंत्र्यांनी अशा बाबतीत ढवळाढवळ करू नये. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, असे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. आधीच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात हा मुद्दाही तापला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी राज्यातील सर्व कुलगुरुंशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

एकूण परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितलं.

सरकारने आधी विद्यापीठातील अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर युवा सेनेने अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून त्याऐवजी श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याची परवानगी मागितली होती. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याला आक्षेप घेतला आणि परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यानंतर राज्यपालांना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची आणि सरकारला अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याबाबत कळवले होते. त्यावेळी त्यांनी उच्च शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षा न घेण्याच्या मागणीवरही कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते.

याबाबत राज्यपालांशी चर्चा झाली आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. युवा सेना आणि अभाविप यांच्या परस्पर विरोधी मागण्यांनंतर मनसेच्या विद्यार्थी संघटनेनेही राज्यपालांना पत्र लिहून अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.

अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु यांच्यातील शनिवारची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.