पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्याला ३० हजार विवाह प्रस्ताव येतात तेव्हा....

पदार्पणापासून त्याच्या लोकप्रियतेत वाढच होत आहे   

Updated: Sep 25, 2019, 05:23 PM IST
पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्याला ३० हजार विवाह प्रस्ताव येतात तेव्हा....  title=

मुंबई : बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन हा फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही बराच लोकप्रिय आहे. हृतिकने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांच्या बळावर वाढणारी त्याची लोकप्रियता पाहता सध्याच्या अभिनेत्यांनाही तो चांगलीच टक्कर देत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

हृतिकने या कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर आता अनेक वर्षे उलटूनही त्याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. या साऱ्याची सुरुवात झाली होती, 'कहो ना प्यार है' या चित्रपटापासून. अमिषा पटेल आणि हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने तो काळ गाजवला होता. ज्याच्या प्रदर्शनानंतर हृतिक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला होता. त्याच्यासाठी प्रेमपत्र लिहिणं म्हणू नका, किंवा त्याचा फोटो सोबत बाळगणं म्हणू नका, हृतिकप्रती असणारं वेड हे वाढतच होतं. 

चाहत्यांकडून त्याच्यावर होणारा प्रेमाचा वर्षाव सुरुच होता. यातच आता हृतिकने एका अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक गोष्टीचा उलगडा केला आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाला हृतिकने नुकतीच हजेरी लावली होती. तेव्हाच त्याने ही बाब सर्वांसमोर ठेवली. 

२००० साली प्रदर्शित झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटानंतर लगेचच त्याला विवाहप्रस्ताव येण्यास सुरुवात झाली होती. बरं, हे प्रस्ताव किती असावेत.....? एक दोन नव्हे, तर तब्बल ३० हजार विवाहप्रस्ताव त्याला आले होते. प्रथमत: ही बाब धक्का देणारी असली तरीही ती नाकारताही येत नाही. कारण, हृतिकची लोकप्रियता सर्वच मर्यादा ओलांडू लागली होती. 

 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

३० हजार विवाहप्रस्ताव आलेल्या हृतिकने त्याच वर्षी सुझॅन खान हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. बऱ्याच वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर सुझॅन आणि हृतिकच्या नात्यात दुरावा आला. अखेर २०१४ मध्ये त्या दोघांनीही परस्पर सामंजस्याने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.