इरफान मायदेशी परतल्यानंतर पत्नीचा भावनिक संदेश, म्हणते...

 'हे आतापर्यंतचं सर्वात मोठं वर्ष होतं'

Updated: Apr 11, 2019, 07:07 PM IST
इरफान मायदेशी परतल्यानंतर पत्नीचा भावनिक संदेश, म्हणते... title=
इरफान खान

मुंबई : न्यूरोएंडोक्राईन ट्युमर नावाच्या एका दुर्धर आजाराशी झुंज दिल्यानंतर अभिनेता इरफान खान काही दिवसांपूर्वी भारतात परतला. लंडनमध्ये बरेच महिने या गंभीर आजारावर उपचार घेतल्यानंतर इरफान परतला आणि त्याच्या चाहत्यांमध्येही आनंदाची लाट पाहायला मिळाली. मायदेशी परतल्यानंतर त्याने 'अंग्रेजी मीडियम' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणालाही मोठ्या उत्साहात सुरुवात केली. 

एकिकडे इरफान त्याच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत असतानाच दुसरीकडे त्याच्या कुटुंबाकडून असंख्यजणांचे आभार मानले जात आहेत. इरफानची पत्नी सुतापा सिकदर हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपल्या आयुष्यातील एका संघर्षमय काळाच्या आठवणी जागवत एक नवी सुरुवात करण्याच्या आशा व्यक्त केल्या आहेत. इरफानच्या आजारपणाविषयी माहिती मिळताच कलाविश्वापासून प्रत्येक चाहत्याने त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हाव्यात यासाठी प्रार्थना केल्या होत्या. त्या प्रत्येक ओळखीच्या आणि अनोखळी व्यक्तीचे सुतापाने मनापासून आभार मानले आहेत. 

'हे आतापर्यंतचं सर्वात मोठं वर्ष होतं', असं म्हणत असंख्य प्रार्थना, सदिच्छा यांच्या बळावर आम्ही पुन्हा आयुष्य जगू लागलो आहोत हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं. ''मित्र, कुटुंब, अनोळखी व्यक्ती आणि या सृष्टी असणाऱ्या नात्याने आम्हाला एक नवी सुरुवात करण्याची संधीच दिली आहे. हे सारंकाही अविश्वसनीय आहे. मला कधीच 'अप्रत्यक्ष' या शब्दाचा इकता चांगला खरा अर्थ उमगला नव्हता. इतरांच्या प्रार्थना, विश्वासाची अनुभूती मला याआधी कधीच झली नव्हती जी सतत मला एकाग्र राहण्यास मदत करत राहिली. मी नावं घेऊच शकत नाही. कारण, काही नावं आहेतही पण अनेक नावं अशीही आहेत जी मला माहितही नाहीत. जे खरंच देवदूत ठरले आहेत'', असं म्हणत तिने या पोस्टच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

सुतापाची ही पोस्ट वाचताना खरंच गेला वर्षभराचा काळ तिच्यासाठी आणि एकंदरच इरफानच्या कुटुंबासाठी किती संघर्षाचा होता, याची अनुभूती होत आहे. अनेक अडचणींवर मात करत काही सुखाच्या क्षणांचा या बॉलिवूड अभिनेत्याच्या आयुष्यावर पुन्हा शिडकावा होत आहे. या साऱ्यात स्वत: इरफान आणि त्याच्या कुटुंबीयांना चाहत्यांच्या प्रार्थनांचा आणि सदिच्छांचा मात्र विसर पडलेला नाही हेच खरं.