५० कोटींच्या तरतुदीपासून हॉलिवूडपर्यंत... अशी होती सुशांतच्या भविष्याची आखणी

....मग आत्महत्या करण्याचं कारण काय?   

Updated: Aug 14, 2020, 01:38 PM IST
५० कोटींच्या तरतुदीपासून हॉलिवूडपर्यंत... अशी होती सुशांतच्या भविष्याची आखणी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला दोन महिने उलटूनही त्याबाबातचे अनुत्तरित प्रश्न अद्यापही अनुत्तरितच राहिले आहेत. अनेक प्रश्नांची उकल न करताच या अभिनेत्यानं आयुष्याच्या रंगमंचावरुन अकाली एक्झिट घेतली. पण, ज्या कलाकाराला हॉलिवूडपर्यंत मजल मारण्याची स्वप्न साकार करायची होती तो नेमकं असं आत्महत्येचं पाऊल का बरं उचलेल, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

सुशांतबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती, भविष्याबाबतची त्याची एकंदर आखणी या साऱ्याची माहिती मिळत आहे त्याच्याच एका डायरीतील काही पानांतून. सुशांतची बहीण श्वेता हिनंच सोशल मीडियावर त्याच्या डायरीतील काही पानांचा व्हिडिओ जो एका वृत्तनाहिनीकडून दाखवण्यात आला होता तो पोस्ट केला आहे. 

'प्रेक्षकांनी अविश्वास दाखवणं बंद करावं असं वाटत असल्याच (कलाकार म्हणून) तुम्ही सर्वप्रथम ते करणं अपेक्षित आहे. कसं? अशा गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा, ज्या पात्राला आवडतात, प्रेमात करुणा आहे किमान हे समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती कोणा एका ध्येय्याच्या शोधात असतो जे त्याच्यासाठी सकारात्मक असतं', असं त्यानं डायरीमध्ये लिहिलं आहे.

'अभिनय कौशल्य, भाषा आणि संस्कृतीमध्ये कमालीचं प्रभुत्त्वं, हॉलिवूडमधील मानांकित एजन्सीशी संपर्क...', असंही सुशांतनं त्याच्या डायरीमध्ये लिहिलं होतं. याचीच झलक सर्वांपुढं मांडत त्याच्या बहिणीनं या पोस्ट्च्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक असा व्यक्ती ज्यानं इतके बेत आखले, स्वप्न सत्यात कशी उतरवायची हे जो जाणतो, जो अविरतपणे सकारात्मकच असतो.... तुला माझा सलाम'.

 

सुशांतच्या स्वप्नांचा व्यास मोठा होता. नव्या जोमाच्या लेखकांना एकत्र आणून तो नव्या धाटणीच्या कथा, लिखाण साहित्य सर्वांच्या भेटीला आणू इच्छित होता. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करु इच्छित होता. 'सिनेमा अपग्रे़ड', शिक्षण आणि पर्यावरण, 'असेट क्रिएशन' अशा सर्व गोष्टींसाठी त्यानं या डायरीमध्ये ५० कोटी रुपये लिहून ठेवले होते. स्वत:च्या स्वप्नांसोबतच सुशांत इतरांची स्वप्न साकारण्यासाठीसुद्धा हातभार लावणाऱ्या वृत्तीचा होता. त्याच्या याच गुणविशेषांनी त्याचं वेगळेपणही सिद्ध झालं होतं. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. परिणामी स्वप्नांची कास धरुन चालणाऱ्या या अभिनेत्यानं परिस्थितीपुढं हात टेकत आत्महत्या करत सर्वांच्या मनाला चटका लावला.