नाना-तनुश्री वादावर 'ही' बॉलिवूड जोडी म्हणतेय...

सहाजिकच अशा आणखीही घटना घडल्या असणारच.

Updated: Oct 4, 2018, 01:09 PM IST
नाना-तनुश्री वादावर 'ही' बॉलिवूड जोडी म्हणतेय... title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरु असणारं आरोप प्रत्यारोपांच्या सत्रावर आता अनेकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे ज्या मुद्द्यावर बी- टाऊनमधील काही मोठ्या प्रस्थांनी बोलणं टाळलं आहे, त्याच विषयावर नव्या जोमाचे कलाकार मात्र खुलेपणाने बोलत आहेत. 

#MeToo या मोहिमेअंतर्गत असभ्य वर्तन, लैंगिक शोषण याविषयी अभिनेत्री खुलेपणाने बोलू लागल्या आणि पाहता पाहता बऱ्याच घटना उघड झाल्या. ज्यामुळे काही जणांचे खरे चेहरेही समोर आले. 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्तानेही नाना पाटेकर यांनी आपल्याशी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेचवर असभ्य वर्तन केल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

या सर्व प्ररकरणी 'नमस्ते इंग्लंड' फेम जोडी, परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांनी काही गोष्टी स्पष्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

तनुश्रीने मांडलेला मुद्दा हा #MeToo मधील एक भाग झाला. मुख्य म्हणजे ही या मोहिमेची सुरुवात नाही. कारण, सहाजिकच अशा आणखीही घटना घडल्या असणारच, असं म्हणत या गंभीर प्रसंगांना सामोरं गेलेल्या प्रत्येक मुलीने त्या प्रसंगाची वाच्यता करावी असं ठामपणे सांगितलं. 

जर तनुश्री सर्वकाही खरं बोलत असेल, ती नक्कीच जिंकेल असं मतही तिने मांडलं. 

परिणीतीप्रमाणेच अर्जुननेही तनुश्रीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. लखोंची लोकसंख्या असणाऱ्या या देशात कोणीही अशा प्रसंगाविषयी बोलण्यापूर्वी अनेकदा विचार करेल. तिने ते धाडस केलं आहे. त्यामुळे तिचं ऐकून घेण्याची गरज आहे हा मुद्दा मांडला.  

कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आणि अंदाज बांधण्यापूर्वी गोष्टी ऐकून घेणं अतिशय गरजेचं आहे, असं मत त्याने मांडलं.

कलाकारांच्या या प्रतिक्रिया आणि एकंदर त्यांच्याकडून मिळणारा पाठिंबा हा तनुश्रीसाठीही अतिशय महत्त्वाचा ठरत असणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.