उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने होतील हे 4 फायदे

तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत असाल तर त्वचे संदर्भातील आजारापासून दूर राहू शकाल. 

Updated: May 3, 2019, 02:23 PM IST
उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने होतील हे 4 फायदे  title=

मुंबई : बाहेरील तापमान वाढल्यानंतर याचा परिणाम शरीरावर देखील होत आहे. सूर्य दिवसागणिक आग ओकतच चालला आहे. उन्हाचा कहर वाढत चालल्याने स्वास्थ्यावर परिणाम होत चालला आहे. सकाळी आंघोळ करुन आपण घरून निघालो नसतो तेव्हापासून घामाच्या धारा यायला सुरुवात होते. घामामुळे त्वचा ओलसर असल्याने धूळ आणि माती शरीराला चिकटू लागते. यामुळे शरीरावर घाम आणि मळ जमा होतो. तसेच अति घामामुळे शरीराला दुर्गंध येऊ लागतो. या साऱ्यातून वाचण्यासाठी काही लोक घरी जाऊन आंघोळ करतात तर काही हात पाय धुवून कपडे बदलतात. दिवसाच्या सुरूवातीला तर सर्वच आंघोळ करतात पण तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत असाल तर त्वचे संदर्भातील आजारापासून दूर राहू शकाल. 

गरमीमध्ये जर तुम्ही रात्री आंघोळ नाही केलात तर त्वचेसंदर्भात अनेक आजार तुम्ही ओढवून घेऊ शकता. रात्री घरी आल्यानंतर तुम्ही आंघोळ करत असाल तर तुमचा दिवसभराचा थकवा दूर झाला असेल. तन आणि मनाने तुम्ही फ्रेश असाल. तुम्हाला शांतीची झोप येऊ शकेल. याचे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊया...

हृदय स्वास्थ्य 

रात्रीच्या वेळी रक्ताचा प्रवास शांत गतीने होत असतो. अशावेळी तुम्ही स्वच्छ पाण्याने स्नान कराल तर रक्त प्रवाह खूप चांगला होईल. हृदयावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे स्वास्थ्य हवे असेल तर तुम्हाला रात्रीच्या आंघोळीची सवय लावायला हवी.

फ्रेश वाटेल 

गरमीच्या दिवसात ऊन, धूळ आणि घामामुळे शरीरावर मळ जमा होतो. रात्रीच्या आंघोळीने शरीर स्वच्छ होते. आंघोळीनंतर तुम्ही फ्रेश आणि ताजेतवान होता. यामुळे तुमची त्वचा देखील चमकत राहील. 

शांत झोप येईल 

गरमीमुळे तणाव आणि शरीर दमल्यासारखे होते. अशावेळी रात्रीच्या आंघोळीने शरीराचा तणाव कुठच्या कुठे जाईल आणि अंथरुणात पडल्या पडल्या तुम्हाला झोप येईल.

रोगप्रतिकारक शक्ती 

गरमीमुळे आपण अनेक गंभीर आजार ओढवून घेतो. यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही आपण कमी करून घेतो. रात्रीच्या वेळी स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते.