कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर

कोरोनाचा नवीन आलेला व्हेरिएंट जलद गतीने पसरताना दिसतोय. 

Updated: Sep 4, 2021, 07:26 AM IST
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर title=

मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. आता या कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स समोर येताना दिसतायत. कोरोनाचा नवीन आलेला व्हेरिएंट जलद गतीने पसरताना दिसतोय. जलद गतीने पसरणारा हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट सी.1.2 चा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 31 आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशांना दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आलंय. युनायटेड किंगडम, युरोप आणि मिडल इस्ट सारख्या देशांना पहिल्या श्रेणीत ठेवण्यात आलं. या देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतात उड्डाण घेण्याच्या 72 तास आधी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक होतं. प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणंही बंधनकारक असेल. जर असे प्रवासी भारतात उतरले तर त्यांची विमानतळावर पुन्हा चाचणी केली जाईल आणि त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले जातील आणि पुन्हा तपासणीसाठी पाठवले जातील.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास मार्गदर्शक तत्त्वं आणि प्रोटोकॉलचा भाग बी 31 ऑगस्ट रोजी सुधारित करण्यात आला आहे. आता दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांचे नमुने पुन्हा विमानतळावरच घेतले जातील.

C.1.2 कोरोनाचा व्हेरिएंट धोकादायक

दक्षिण आफ्रिकेने कोविड 19 चा सी.1.2 हा नवा व्हेरिएंट सापडला. देशातील कोविडच्या तिसऱ्या लाटेदरम्यान C.1.2 ची पहिली ओळख मे 2021 मध्ये झाली. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशनल डिसीजेस (एनआयसीडी) आणि क्वाझुलू-नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वन्सिंग प्लॅटफॉर्मच्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं

कोरोनाचा C.1.2 हा व्हेरिएंट महामारीच्या उद्रेकानंतरची सर्वात म्युटेटेड वर्जन असल्याचं मानलं जातंय. गेल्या शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली होती की केवळ कोरोना लसीकरण हा महामारी थांबवण्याचा एकमेव मार्ग नाही. लसीकरणानंतरही लोकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केले. पुन्हा एकदा शास्त्रज्ञ म्हणतात की सावधगिरी बाळगा, लोकांनी लसीकरणानंतरही कोविड प्रोटोकॉलचे पालन केलं पाहिजे.