अमित शाहांनी बोलावली जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक

जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेटची बैठक

Updated: Jun 19, 2018, 08:09 AM IST
अमित शाहांनी बोलावली जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक title=

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. जम्मू काश्मीरचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र राणी यांना देखील या बैठकीत बोलावण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा डोकं वर काढलं आहे. रमजानच्या महिन्यात शांतता म्हणून मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी लष्कराने कारवाई करु नये अशी मागणी केली होती. त्याला केंद्र सरकारने देखील हिरवा कंदील दिला होता.

जम्मू काश्मीरमध्ये रमजानचा महिना संपल्यानंतर भारतीय सैनिकांनी पुन्हा ऑपरेशन ऑलऑऊट सुरू केलं आहे. दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. घाटीतील बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सैनिकांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. सेना आणि दहशतवाद्यांमध्ये घनदाट जंगलात सुरू असलेल्या चकमकीत एअर फोर्सही सैनिकांची मदत करत आहे.

सीजफायर संपल्याची घोषणा रविवारी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सर्वसाधारण माणस रमझानच्या पवित्र सणाचा आनंद घेऊ देत यासाठी सीजफायर लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पण दहशतवाद्यांवर याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी या संधीचा फायदा घेत दहशतवादी हल्ले केले. घाटीमध्ये दहशतवादमुक्त आणि शांतियुक्त वातावरण प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईदच्या एक दिवस आधी रायजिंग काश्मीरचे संपादक आणि पत्रकार शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. बुखारी यांचे दोन सुरक्षारक्षकही यामध्ये मारले गेले. तसेच ईदच्या सुट्टीसाठी घरी येत असलेला जवान औरंगजेब याचीही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दहशतवाद्यांविरूद्ध लोकांच्या मनात असंतोष वाढला आहे.