देशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही

बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 9, 2017, 03:30 PM IST
देशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही title=

बंगळुरू : बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

नागरी उड्डान मंत्रालयाने नुकतीच ही घोषणा केली आहे. प्रवाशांना खूप सारी कागदपत्रे आणि त्यापासून होणारा विलंब टाळण्यासाठी ही प्रणाली राबविण्यात येत आहे. अनेकदा प्रवाशांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप सारी कागदपत्रे मागितली जातात. तसेच, त्यांची कसून तपासणीही केली जाते. अशा वेळी प्रवाशांचा वेळही जातो आणि प्रशासनावरही ताण येतो. यापासून सुटका मिळविण्यासाठी सरकारने बायोमेट्रीक प्रणाली वापरण्याचे ठरवले आहे.

विमानप्रवासाचे तिकीट बुक करतानाच बायोमेट्रीक एण्ट्री प्रणालीने तुमचे तिकीट बुक केले जाईल. पुढच्या वर्षातील मार्च महिन्यापासून बंगळुरूच्या केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानळावर (केआयए) ही प्रणाली कार्यरत होईल. ही प्रणाली राबवणारे देशातील पहिलेच विमानतळ ठरण्याचा मान केआयएला मिळणार आहे.

ही प्रणाली कार्यरत झाल्यावर प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. विमान पकडण्यासाठी सध्यास्थिती प्रवाशांना फार वेळ खर्च करावा लागतो. मात्र, ही प्रणाली कार्यरत झाल्यावर प्रवाशांना केवळ १० मिनीटात विमान पकडता येणार आहे. ही प्रणाली कार्यरत झाल्यावर सर्वच प्रवाशांना बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करून प्रवासाची सुरूवात करावी लागणार आहे. तसेच, या प्रवाशांना आपला आयडीप्रुफही दाखवावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही प्रणाली वापरताना तुम्हाला तिकीट सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उड्डानमंत्रालयाती उच्च अधिकारी आरएन चौबे यांनी दिली आहे. या प्रणालीचे प्रवाशांकडून स्वागत केले जाईल असा विश्वात चौबे यांनी व्यक्त केला.