चिनी उत्पादनांवर बंदी घालून काडीचाही फरक पडणार नाही- पी. चिदंबरम

चीनचा भारताशी होणारा व्यापार हा त्यांच्या जागतिक स्तरावरील व्यापारी उलाढालीच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. 

Updated: Jun 20, 2020, 04:09 PM IST
चिनी उत्पादनांवर बंदी घालून काडीचाही फरक पडणार नाही- पी. चिदंबरम title=

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील भारत आणि चिनी सैन्यातील रक्तरंजित संघर्षानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. 

'टीम इंडिया'मध्ये या चायनीज कंपन्यांनी लावलाय पैसा

पी. चिदंबरम यांनी म्हटले की, भारतीय बाजारपेठेत चिनी उत्पादनांवर बंदी घातली तरी चीनच्या अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही. त्याऐवजी भारताने स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला पाहिजे. मात्र, याचा अर्थ उर्वरित जगाशी व्यापारी संबंध तोडावेत, असा होत नाही. भारताने चिनी उत्पादनांवर बंदी न घालता जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थान कायम ठेवले पाहिजे. चीनचा भारताशी होणारा व्यापार हा त्यांच्या जागतिक स्तरावरील व्यापारी उलाढालीच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. त्यामुळे भारताने चिनी उत्पादनांवर बंदी टाकली तरी चिनी अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही. देशाच्या संरक्षणासारखा संवेदनशील विषय हाताळताना आपण उत्पादनांवर बंदी आणण्याचा मुद्दा विचारात घेता कामा नये, असे मत पी. चिदंबरम यांनी मांडले. 

चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी रामदास आठवलेंनी दिला 'हा' सल्ला

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले उचलण्यात आली होती. भारतातील अनेक चिनी कंपन्यांची कंत्राटे आणि करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपन्यांना चिनी उपकरणे न वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते.