चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल, दुसऱ्या टप्प्यात कक्षा बदलली

श्रीहरिकोटा येथून २२ जुलै रोजी अवकाशात झेपावलेले चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.  

ANI | Updated: Jul 26, 2019, 04:41 PM IST
चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल, दुसऱ्या टप्प्यात कक्षा बदलली title=
Pic Courtesy : PTI

बंगळुरु : श्रीहरिकोटा येथून २२ जुलै रोजी अवकाशात झेपावलेले चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. त्यामुळे चंंद्रयान-२ हे  ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. ते चंद्रावर उतल्यानंतर भारताला मोठे यश मिळेल. दरम्यान,  इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी सकाळी चांद्रयान-२ ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. चांद्रयान-२ ची कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता. चांद्रयान-२ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना यश येत आहे.

चंंद्रयान-२ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले आहे.  चंंद्रयान-२ अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान १७० किमी आणि कमाल ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिर करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा चंंद्रयान-२  ची कक्षा बदलण्यात आली होती. चंंद्रयान-२  चा प्रवास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून देण्यात आली आहे.

चंंद्रयान-२ चा दुसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता पुढच्या दहा दिवसांत आणखी तीन वेळा चंंद्रयान-२  च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चंंद्रयान-२ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चंंद्रयान-२ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल २९ जुलै आहे. त्यानंतर दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाणार आहे.

चंंद्रयान-२ हे १४ ऑगस्टला  पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर २० ऑगस्टला चंंद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, असे इस्रोकडून सांगण्यात आले. ३ सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर ७ सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल, अशी याची मोहीम आखण्यात आली आहे.