लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी

लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Updated: Jun 2, 2018, 09:21 AM IST
लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी  title=
File Photo

नवी दिल्ली : लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. बिहारमध्ये २०१५च्या निवडणुकीत महाआघाडी केल्याचा काँग्रेसला चांगला फायदा झाला. स्थानिक पक्षांना सोबत घेतल्याचा पक्षाला फायदा होत असल्याचं काँग्रेस नेत्रृत्वाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच आता आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे देशभरातील विविध स्थानिक पक्षांसोबत आघाडी करत ४०० ते ४५० जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आघाडीसाठी चर्चा सुरु 

स्थानिक पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने गंभीरतेने घेतला असून त्यासाठी कामही सुरु केलं आहे. त्यामुळे याच महिन्यात वेगवेगळ्या स्थानिक पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेत्रृत्वात कमिटी बनवण्यात येत आहे. राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतर यावर काम सुरु करण्यात येणार आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ५ वर्षांपूर्वी जे राहुल गांधी आघाडी करण्यास उत्सुक नव्हते तेच आता आघाडी करण्यास उत्सुक झाले आहेत. काँग्रेस पक्षासोबत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय लोकदल आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत काँग्रेस पक्षाचे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चांगले संबध आहेत. तर, कर्नाटकातही जेडीएसची साथ मिळाली आहे.

आता हरियाणा, तामिळनाडु, पश्चिम बंगाल, केरळ सारख्या राज्यात स्थानिक पक्षांसोबत आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यासोबतच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांत बसपासोबत आघाडी करण्यास पक्ष तयार आहे.

२०० ते २५० जागांवरच निवडणूक लढणार?

आघाडी केल्यानंतर काँग्रेस पक्षा केवळ २०० ते २५० जागांवरच लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नावर काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ऐकायला हे खूपच विचित्र वाटेल पण, परिस्थितीनुसार अशा स्थितीचाही स्विकार करावा लागेल. तुम्ही किती जागांवर निवडणूक लढत आहात याला महत्व नाहीये तर तुम्ही किती जागांवर विजय मिळवणार हे महत्वाचं आहे.

यावर पक्षाचे वरिष्ठ नेता अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, किती जागांवर पक्ष आघाडी करणार हे अद्याप निश्चित नाहीये. मात्र, संपूर्ण देशात स्थानिक समिकरणं पाहता काँग्रेस पक्षा आघाडीसाठी तयार आहे.