'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

Ayodhya Ram Mandir : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधीच तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय.

आकाश नेटके | Updated: Jan 4, 2024, 01:50 PM IST
'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा title=

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान वाढले आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला धारेवर धरले आहे. अयोध्येत खर्च होत असलेल्या लाखो कोटी रुपयांपैकी किती लोकांना नोकऱ्या आणि शिक्षण मिळाले असेल, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. भाजपचे लोक पाप करतात आणि मग राम-राम करतात, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

तेजस्वी यादव 3 जानेवारी रोजी माजी खासदार रामदेव भंडारी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मधुबनीतील झांझारपूर येथे पोहोचले होते. त्यावेळी अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत तेजस्वी यादव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. राम मंदिराच्या नावावर भाजप स्वतःचे आणि पंतप्रधान मोदींचे मार्केटिंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

"आजारी पडलात तर दवाखान्यात जाणारच ना? भूक लागली तर मंदिरात गेल्यास खायला मिळेल का? तिथे ते तुमच्याकडून देणगी मागतील, तुम्ही लोकांना जागं व्हावे लागेल. मी कोणत्याही धर्मावर शंका घेत नाही. मी स्वत: मुंडन करून येथे आलो आहे. माझ्या घरी छठपूजा साजरी केली जाते. देव माझ्या हृदयात आहे. हे लोक (भाजप) म्हणतात की त्यांनी भगवा आणला आहे. आमच्या तिरंग्यात फक्त भगवा रंग आहे. आणि ते हिरवा देखील आहे. पण हिरवा झेंडा घेऊन फिराल तर ते म्हणतील बघा, द्वेष निर्माण होतोय. अयोध्येत खर्च झालेल्या लाखो कोटी रुपयांतून किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, शिक्षण मिळाले असते," असे तेजस्वी यादव म्हणाले.

"मोदी हे भेसळखोर आहेत. हा सगळा लबाड लोकांचा कारखाना आहे. प्रभू रामांना मोदीजींची गरज का आहे? प्रभू रामांना हवे असते तर त्यांनी स्वतःचा महाल बांधला नसता का? पण मोदी रामासाठी घर आणि महाल बांधल्याचे दाखवत आहेत. ही सगळी फालतू चर्चा आहे. विश्वास मनात असावा आणि हेतू स्पष्ट असावा. पाप करत राहिलो आणि राम रामाचा जप केला तर राम वरदान देणार नाही," असेही तेजस्वी यादव म्हणाले.