दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.  

Updated: Feb 27, 2020, 09:18 PM IST
दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले title=
Pic Courtesy : PTI

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर (Delhi HC judge S Muralidhar) यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे. केंद्र सरकारकडून न्याय दडपण्याचा प्रकार सुरु झाला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे. तर बदलीबाबत न्या. लोयांचा उल्लेख करत भाजपला टोला, लगावला आहे. दरम्यान, दिल्ली हिंसाचारावरून ( Delhi violence)  मुरलीधर यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची बदली करण्यात आली. या बदलीवरून विरोधकांची सरकारवर टीका आहे. 

दरम्यान, इशान्य दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत शांतता राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून नागरिकांना शांततेचं आवाहन करायला सुरूवात केली आहे. दिल्ली पोलीस सहआयुक्त ओ. पी. मिश्रा यांनी स्वतः चांद बाग आणि मुमा नगर या भागांचा दौरा केला. हातात माईक घेऊन सहआयुक्त मिश्रा नागरिकांना शांततेचं आवाहन करत फिरत होते.

दिल्ली हिंसाचारावरून सरकार आणि पोलीस यंत्रणांना फटकारे लगवणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांची एका रात्रीत बदली करण्यात आली आहे. त्यांना पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या बदलीची अधिसूचना जारी केली आहे. मुरलीधरन यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. तसेच पोलिसांमुळे परिस्थिती चिघळल्याचा ठपका ठेवला होता. दरम्यान, १२ फेब्रुवारी २०२० लाच सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने केंद्र सरकारला न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीची शिफारस केली होती.