देशभरात डेंग्यूचं थैमान, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण

Updated: Oct 11, 2019, 11:01 AM IST
देशभरात डेंग्यूचं थैमान, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज title=

मुंबई : डेंग्यूने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. कल्याण, ठाणे, मुंबई, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन मात्र उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचं समोर आलं आहे.

हैदराबादमध्ये यावर्षी डेंग्यूने थैमान घातलंय. डेंग्यूचे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण हैदराबादमध्ये आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हैदराबाद इथे जाणाऱ्या नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. 

मागील महिन्यात वसई-विरारमध्ये दोन महिलांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर एका आठवड्यातच डेंग्यूमुळे आणखी एका मुलीने देखील आपला जीव गमवला होता. 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना देखील डेंग्यूची लागण झाल्यामुळे मुंबईतील खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते.

डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेट्स काउंट झपाट्याने कमी होतात. ज्यामुळे रूग्णाच्या जीवाला धोका तयार होतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर ताबडतोब योग्य उपचार घेतले पाहिजे.

डेंग्यूची लक्षणं

- ताप येणं
- डोकं दुखणे
- सांधे दुखी 
- पोटदुखी
- उलट्या होणं
- हिरड्यांमधून रक्त येणं
- श्वास घेण्यास त्रास होणं 
- थकवा