India China Faceoff : भारत-चीन सैनिकांत तवांग सीमेवर झटापट, नेमकं काय घडलं?

चीनचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेवर कुरापती चीननं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला.  

Updated: Dec 12, 2022, 11:30 PM IST
India China Faceoff : भारत-चीन सैनिकांत तवांग सीमेवर झटापट, नेमकं काय घडलं? title=

मुंबई : चीननं (China) पुन्हा एकदा भारताची (India) कुरापत काढलीय.  अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) पुन्हा एकदा भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली.  तब्बल ३०० हून अधिक चिनी सैनिक चाल करून आले होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांना मुँहतोड जबाब दिला. नेमकं काय घडलं, पाहूयात हा रिपोर्ट. (indian troops in area of face off in tawang gave befitting response to chinese troops)

चीनचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेवर कुरापती चीननं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं 9 डिसेंबरच्या रात्री  नियंत्रण रेषेपर्यंत धडक दिली. मात्र चीनचा हा घुसखोरीचा खटाटोप जाँबाज भारतीय जवानांनी हाणून पाडला.  यावेळी भारत आणि चीनचे जवान पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. या झटापटीत दोन्ही बाजूंचे सुमारे ३० जवान जखमी झाल्याचं समजतंय.

या झटापटीनंतर दोन्ही देशांचे सैनिक तवांग सीमेवरून मागे हटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या घटनेनंतर परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सनी फ्लॅग मिटींग घेतली. चीनच्या कुरापतीची ही पहिलीच वेळ नाही.

ड्रॅगनच्या कुरापती थांबेनात

अरुणाचलच्या तवांग सीमेवर 2006 पासून  झटापटी सुरू आहेत. ऑक्टोबर 2021 मध्येही भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यांगसे भागात चिनी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांना काही तास ताब्यात घेतलं होतं. तर 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खो-यातही दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी भारताचे सुमारे 20 जवान शहीद झाले होते. तर केवळ 5 चिनी सैनिक ठार झाल्याचा दावा चीननं केला होता. 2017 साली देखील डोकलाममध्ये दोन्ही सैन्यामध्ये तब्बल 73 दिवस धुमश्चक्री सुरू होती.

लडाख असो नाहीतर अरुणाचल प्रदेश, भारताची कुरापत काढण्याची एकही संधी चिनी ड्रॅगन सोडत नाही. मात्र चिनी ड्रॅगनचं वळवळणारं शेपूट ठेचून काढण्याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे आणि प्रत्येक हल्ल्यात भारतीय जवानांनी ते सिद्ध करून दाखवलंय.