पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 4, 2023, 01:10 PM IST
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना title=

Karnataka Crime : कर्नाटकातल्या (Karnataka News) बंगळुरुमध्ये (bangalore) एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरू येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करून आत्महत्या केली आहे. या तरुणाने पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करून नंतर स्वत:ला संपवलं आहे. हे कुटुंब मूळचे आंध्रप्रदेशचे असून काही काळापासून बंगळुरू येथे राहत होते अशी माहिती पोलिसांनी (Bangalore Police) दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत.

बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागात हा सगळा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. "एका अभियंत्याने पत्नी आणि दोन मुलींचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःला संपवलं आहे. वीररार्जुन विजय, पत्नी हायमावती (29) आणि दोन लहान मुले अशी मृतांची नावे आहेत. वीररार्जुनच्या घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे वीररार्जुन इतके कठोर पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही," अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पथकाने फ्लॅटमधून पुरावे गोळा केले आहेत.

31 जुलै रोजी पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली असावी आणि त्यानंतर त्याच दिवशी पंख्याला गळफास घेऊन वीररार्जुनने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. गुरुवारी हायमावती भाऊ सत्य साई वीररार्जुनच्या घरी गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अनेकदा दरवाजा ठोठावूनही कोणी प्रतिसाद न दिल्याने त्याला संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन घराचा दरवाचा उघडला असता चौघांचेही मृतदेह आढळून आले.

पोलिसांनी काय सांगितले?

"आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला. घराच्या दिवाणखान्यात त्याची पत्नी आणि दोन मुली जमिनीवर पडलेल्या होता. तर वीररार्जुनला आम्ही पंख्याला लटकलेले आम्ही पाहिले. महिला आणि दोन मुलांच्या मानेवरही गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या," अशी माहिती पोलिसांनी दिली.

"गेल्या काही दिवसांपासून वीररार्जुन आणि त्याची पत्नी संपर्कात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वीररार्जुनने आधी पत्नीचा आणि नंतर दोन्ही मुलींचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांची हत्या केल्यानंतर त्याने पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले," असे पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी सांगितले की, दोघांच्या लग्नाला सहा वर्षांहून अधिक काळ झाला होता.