केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये

Updated: Aug 8, 2020, 04:19 PM IST
केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह  title=

मुंबई : केरळमधील कोझिकोड एअरपोर्टवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात मृत्यू पावलेल्या दोन प्रवाशांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी झालेल्या या अपघातात दोन पायलटसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत दुबईहून कोझिकोड येथे येणारे विमान धावपट्टीवर कोसळले. यातील दोन प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 

विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधन यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान घटनास्थळी पोहोचले. 

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. दुबईहून भारतात येत असलेल्या १९० प्रवाशांना घेऊन हे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी भरपूर पावसादरम्यान लँडिंग करत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं आणि ते ३५ फूट खाली कोसळलं. या अपघातात १८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. हे विमान खाली कोसळलं तेव्हा त्याचे दोन तुकडे झाले.  

या अपघातात मृत्यू झालेल्यां लोकांमध्ये पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार हेही आहेत. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते. 

कोझिकोड येथे झालेल्या अपघातात देशाने दोन शूर पायलट गमवले. अपघातात 59 वर्षीय दीपक वसंत साठे आणि 33 वर्षीय कॅप्टन अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. दीपक साठे यांची गणना देशातील सर्वोत्तम वैमानिकांमध्ये केली जाते.

हवाई दलाचा अनुभव आणि कार्यक्षम विमानप्रवासाच्या अनुभवावरुन दीपक यांनी कोझिकोड विमानतळावर विमानाला वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने विमानाला आग लागली नाही. ज्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.

एअर इंडियासाठी काम करणारे दीपक हे एकेकाळी हवाई दल अकादमीचे बेस्ट कॅडेट म्हणून ओळखले जात होते. दीपक साठे यांनाही त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर वायुसेना अकादमीकडून प्रतिष्ठित 'स्वर्ड ऑफ ऑनर' पुरस्कार मिळाला होता. हवाई दलाच्या नोकरीनंतर दीपक एअर इंडियाच्या व्यावसायिक सेवेत रुजू झाले. पायलट दीपक साठे यांचे वडील सैन्यात ब्रिगेडियर होते. त्याच वेळी त्यांचा एक भाऊ कारगिल युद्धात शहीद झाला होता.

एअर इंडियाचे एअरबस 310 विमान आणि बोईंग 737 अशी विमानं उड्डाण करणारे दीपक साठे हे देशातील मोजके पायलटांपैकी एक होते. कोझिकोड अपघातामुळे देशाने दोन सर्वोत्कृष्ट पायलट गमावले.