'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 16, 2024, 05:10 PM IST
'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया title=

Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी तिसऱ्यांदा पुन्हा आपण सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. 

"लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणाला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा-एनडीए या निवडणुका लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. 140 कोटी कुटुंबातील सदस्य आणि 96 कोटी मतदारांचे पूर्ण स्नेह आणि आशीर्वाद आपल्याला सलग तिसऱ्यांदा मिळतील असा मला विश्वास आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले आहेत की, "10 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही देशाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देश आणि नागरिक इंडिया आघाडीच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त होते. असं एकही क्षेत्र नव्हतं जिथे घोटाळा सुरु होा. देश निराशेच्या गर्तेत गेला होता आणि जगानेही भारतावर विश्वास ठेवणे सोडलं होते. त्या परिस्थितीतून आम्ही देशाला बाहेर काढले आणि आज भारत झपाट्याने प्रगती करत आहे. 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याने आणि शक्तीने आपला देश दररोज विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि करोडो भारतीय गरीबीतून बाहेर आले आहेत. आपल्या सरकारच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या आहेत. आम्ही 100 टक्के देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आमच्यासमोर आहेत".

"आज विरोधकांकडे ना मुद्दा आहे ना दिशा. आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यांची कौटुंबिक मानसिकता आणि समाजात फूट पाडण्याचे कारस्थान जनता आता नाकारत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांना लोकांशी संपर्क साधता येत नाही. अशा लोकांना जनता कधीच स्वीकारणार नाही. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशासाठी खूप काम करायचे आहे. अनेक दशकं राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेली खोल दरी भरून काढण्यात आपली गेली 10 वर्षे गेली. या 10 वर्षांत आपला भारतही समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो, असा विश्वास देशवासियांना मिळाला आहे. आमच्या पुढील कार्यकाळात या संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा होईल," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले आहेत की, "एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक तीव्र होणार आहे. सामाजिक न्यायासाठी आमचे प्रयत्न आणखी वाढतील. आम्ही वेगाने भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू. तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक ताकदीने पुढे जातील. प्रामाणिक, दृढनिश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार किती काही करू शकतं याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाला होत आहे. त्यामुळेच आपल्या सरकारकडून प्रत्येक देशवासीयांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. म्हणूनच आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि समाजाच्या प्रत्येक घटकातून 400 के पार हा एकच आवाज ऐकू येत आहे".

"मी स्पष्टपणे पाहू शकतो की येणारी 5 वर्षं हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल ज्यामध्ये आपण भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास प्रवासाचा रोडमॅप तयार करू. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल. मला माझ्या देशवासीयांच्या आशीर्वादाने, विशेषत: गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांकडून शक्ती मिळते. जेव्हा माझे देशवासी म्हणतात – “मी मोदींचे कुटुंब आहे”, तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतात. विकसित भारतासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. हीच योग्य वेळ आहे," असं मोदींनी सांगितलं आहे.