Rahul Shewale : ....म्हणून आम्ही बाहेर पडलो, राहुल शेवाळे यांनी कारण सांगितलंच

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतरही सत्तासंघर्ष हा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली.

Updated: Jul 19, 2022, 06:40 PM IST
Rahul Shewale : ....म्हणून आम्ही बाहेर पडलो, राहुल शेवाळे यांनी कारण सांगितलंच  title=

नवी दिल्ली :  महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतरही सत्तासंघर्ष हा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या दरम्यान शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच शेवाळे यांनी यावेळेस 2019 चा वचननामाही वाचवून दाखवला. (maharashtra political crisis shiv sena mp rahul shewale press confrence with cm eknath shinde)

राहुल शेवाळे काय म्हणाले?

शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून  2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. आम्ही प्रचंड मताधिक्क्याने विजयी झालो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 निवडणुकीसाठी वचननामा बनवला होता. यात प्रामुख्याने चार गोष्टी होत्या. त्यातली पहिली गोष्ट होती, देशाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवसेना-भाजप एकत्र राहिल, हिंदुत्वाचे रक्षण आणि राममंदिराच्या उभारणीसाठी भाजपसोबत युतीचा निर्णय आणि गेल्या साठ सत्तर वर्षात काँग्रेस सरकारला जे जमलं नाही, असे महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन विकासाचे प्रकल्प उभारण्यासाठी या पाच वर्षात प्रयत्न त्यासाठी एनडीएला संधी देण्यासाठी युती महत्वाची, भ्रष्टाचाराला आळा, असा वचननामा बनवला होता. 

पण दुर्देवाने महाविकास आघाडी झाली आणि जो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवला त्यात या वचननाम्यातील कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार जो पुढे नेण्याचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व खासदार उपस्थित आहोत. त्यांचं धोरण आणि त्यांचं नेतृत्व आम्ही स्विकारला आहे. 

महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध 12 खासदारांनी लढा दिला आणि त्यात आम्ही जिंकलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आयुष्यभर लढा दिला त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करावी लागली.