NEET परीक्षा सरसकट रद्द नाही, केवळ 1563 विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET UG 2024: नीट परीक्षा फेरफार आरोप प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 13, 2024, 12:37 PM IST
NEET परीक्षा सरसकट रद्द नाही, केवळ 1563 विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेरपरीक्षा;  सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय title=
NEET UG 2024 to be reconducted for 1563 students who got grace marks

NEET UG 2024: नीट युजी परीक्षेच्या हेराफेरी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा निकालांमध्ये अनियमितता पाहून एनटीएचे ग्रेस मार्क रद्द करुन पुन्हा फेर परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 

ग्रेस गुणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा यू-टर्न

67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण कसे मिळाले, असा प्रश्न सर्वोच्च न्यायलयाने केला असता. एनटीएने ग्रेस गुणांमुळं इतके गुण मिळाले आहेत, असं स्पष्टीकरण दिलं आहे. काही परीक्षा केंद्रांवर लॉस ऑफ टाइममुळं 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले आहेत. त्यामुळं 44 विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला ग्रेस गुण रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

NEET परीक्षांचे निकाल आल्यानंतर आत्तापर्यंत दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. ग्रेस गुण मिळवलेल्या 1563 विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर, मुलांच्या समुपदेशन रोखण्यावरही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी 2024 च्या परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळाले आहेत त्यांची फेरपरीक्षा 23 जून रोजी होणार आहे. NTAने म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना एनटीएकडून ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत त्यांना एनटीएने दोन पर्याय दिले आहे. एकतर हे विद्यार्थी फेरपरीक्षा देऊ शकतात किंवा त्यांच्या जुन्या गुण तसेच ठेवून फक्त त्यांच्या स्कोअरकार्डवरुन ग्रेस मार्क्स हटवण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना ते फेरपरीक्षेमध्ये चांगलं प्रदर्शन करु शकतील असा विश्वास आहे, ते फेरपरीक्षा देऊ शकतात. 

पाच मे रोजी देशभरात नीट परीक्षा झाली होती. त्यानंतर 4 जून रोजी जेव्हा निकाल आला तेव्हा देशभरात मोठी खळबळ माजली होती. 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले होते. तर, 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग देण्यात आली होती. हे ग्रेस मार्क 10,20 किंवा 30 असे नव्हे तर 100 ते 150 गुण दिले होते. त्यामुळं अनेक विद्यार्थी जे मेरिटच्या बाहेर आहेत. तेदेखील मेरिटमध्ये आले. त्यामुळं मेरिटमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळणे मुश्लीक झाले आहे.