लोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय

Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरु असताना सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या. संसदेबाहेरही तरुणांची निदर्शनं केली. यात महाराष्ट्रातील एका तरुणाचाही समावेश आहे.

राजीव कासले | Updated: Dec 13, 2023, 02:24 PM IST
लोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय title=

Parliament Security Breach: आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसेदवर हल्ला (Parliament Attack) झाला होता. या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली. आणि आजच्याच दिवशी संसदेत पुन्हा दोन अज्ञातांनी घुसखोरी केल्याने खळबळ उडाली आहे. जिथून देशाचा कारभार चालवला जातो. त्या संसदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रेक्षक गॅलरीतून एक तरुणाने संसदेत उडी मारली. त्याच्यापाठोपाठ आणखी एका तरुणाने उडी मारली. त्यानंतर त्याने बेचंवरुन उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने पायातले बूट काढले पळू लागला. पण तेवढ्यात खासदारांनी त्या तरुणाला अटक केली. दुसऱ्या तरुणालाही पकडण्यात आलं. आरोपींच्या बुटात गॅस पाईपसारखी वस्तू  (Smoke Gun) होती, ज्यातून पिवळा धूर निघत होता. या घटनेनंतर लोकसभेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. 

 हे  दोघेही खासदारांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. मात्र या सर्व प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय... विशेष म्हणजे आजच संसदेवर झालेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली... त्याच दिवशी लोकसभेची सुरक्षा भेदली जाणं ही घटना धक्कादायक मानली जातेय... खासदारांनीही या घटनेनंतर सुरक्षेवर चिंता व्यक्त केलीय...

नागपूर अधिवेशनात खबरदारी
लोकसभेत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच खबरदारी म्हणून नागपूर अधिवेशनात गॅलरी पास देणं बंद करण्यात आलं आहे.  दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी घालण्यात आली आहे.  लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने हा  तात्काळ निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी सभागृहात ही माहिती दिली. याशिवाय विधानसभेत आता आमदार यांना दोन पास दिले जातील  अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात माहिती दिली.

22 वर्षांपूर्वीची हल्ल्याची आठवण
या घटनेने 22 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी झाली आहे. 13 डिसेंबर 2001 ला पाकिस्तान दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. दहशतवद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात दिल्ली पोलिसांच्या जवानांसह नऊ जण शहीद झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते.