...म्हणून भाजपा नेत्यांचा मृत्यू होतोय, प्रज्ञासिंह ठाकूर बरळल्या

भोपाळच्या भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणखी एका नव्या वादात अडकल्या आहेत.

Updated: Aug 26, 2019, 04:49 PM IST
...म्हणून भाजपा नेत्यांचा मृत्यू होतोय, प्रज्ञासिंह ठाकूर बरळल्या  title=

नवी दिल्ली : भोपाळच्या भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणखी एका नव्या वादात अडकल्या आहेत. विरोधकांनी भाजपाच्या नेत्यांवर अघोरी शक्तीचा वापर केलाय आणि त्यामुळे एकापाठोपाठ एक भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू होतोय असा अजब दावा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना श्रद्धाजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रज्ञासिंह बरळल्या आहेत. प्रज्ञासिंह या साध्वी असल्या तरी त्या आता लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या या बेजबाबदार विधानावर चौफेर टीका होत आहे. 

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात साध्वी प्रज्ञा यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे माजी एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी म्हटले होते.

नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते.