भाजप पैशांचा वापर करून सरकारं पाडतंय- राहुल गांधी

कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर आहे.

Updated: Jul 12, 2019, 07:31 PM IST
भाजप पैशांचा वापर करून सरकारं पाडतंय- राहुल गांधी title=

अहमदाबाद: भाजप पैशांच्या जोरावर अनेक राज्यांतील सरकारं पाडत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. ते शुक्रवारी अहमदाबाद येथे बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक आणि गोव्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना म्हटले की, भाजप धनशक्तीचा वापर करून अनेक राज्यांमधील सरकारं पाडत आहे. आतापर्यंत ते हेच करत आले आहेत. यापूर्वी ईशान्य भारतात आपण ते बघितले होते, असे राहुल यांनी म्हटले. 

राहुल गांधी यांच्यावर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक आणि बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांच्याकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी शुक्रवारी अहमदाबादच्या दंडाधिकारी न्यायालयात आले होते. 

दरम्यान, कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी १० बंडखोर आमदारांचे राजीनामे योग्य आहेत की अयोग्य यासंदर्भात मंगवारपर्यंत निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाने सांगितले. १६ जुलैला या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. 

गोवा, कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?

 कर्नाटकातले बंडखोर आमदार पवईमधल्या हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. काल विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांची भेट घेऊन ते पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले. आमदारांचे वास्तव्य असलेल्या पवईतील रेनेझान्स हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. या आमदारांनी शुक्रवारी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.