Ramoji Rao Death: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramoji Rao Death: शनिवारी पहाटे तेलंगणामधील हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 8, 2024, 08:49 AM IST
Ramoji Rao Death: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास title=

Ramoji Rao Death: साऊथ इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर येतेय. एनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं आहे. शनिवारी पहाटे तेलंगणामधील हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारांदरम्यान त्यांना मृत्यू झाला. पहाटे 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

5 जूनपासून होते रुग्णालयात दाखल 

5 जूनपासून रामोजी राव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास त्यांना जाणवत होता. यावेळी त्यांना हैदराबादच्या स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शिवाय त्यांच्या हृदयात स्टेंट लावण्यात आला होता. मात्र या काळात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. आज पहाटे त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली.

कोण होते रामोजीराव ?

रामोजी यांचा प्रवास प्रत्येकासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी बांधलं. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स हे त्यांचे व्यवसाय होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रामोजी राव यांचे पार्थिव रामोजी फिल्मसिटीतील त्यांच्या निवासस्थानी नेणार आहे. यावेळी त्यांचं कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक श्रद्धांजली वाहतील.

पीएम मोदींनी केला शोक व्यक्त 

रामोजी राव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “श्री रामोजी राव गरू यांचं निधन अत्यंत दुःखद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते मोठे व्यक्ती होते. त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली आहे. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांद्वारे त्यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे नवीन मानक स्थापित केले. रामोजी राव गरू हे भारताच्या विकासाविषयी अत्यंत तळमळीचे होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मिळाल्या हे माझं भाग्य आहे. ओम शांती.''