"तू स्वत:ला संपवू नकोस रे...", सुशांत सिंगच्या आठवणीत स्मृती इराणींच्या डोळ्यात पाणी, 'त्या' फोन कॉलची काढली आठवण

Smriti Irani Gets Emotional: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आठवणीत भावूक झाल्या असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. सुशातच्या निधनानंतर त्यांनी तात्काळ अभिनेता अमित साधला (Amit Sadh) फोन केला होता. त्याच्याकडे त्यांनी सुशांत सिंग असा काही मूर्खपणा करु शकतो अशी भीती व्यक्त केली होती.   

Updated: Mar 26, 2023, 10:22 AM IST
"तू स्वत:ला संपवू नकोस रे...", सुशांत सिंगच्या आठवणीत स्मृती इराणींच्या डोळ्यात पाणी, 'त्या' फोन कॉलची काढली आठवण title=

Smriti Irani Gets Emotional: 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) मालिकेत तुलसीची भूमिका निभावत घरोघऱी पोहोचलेल्या अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सध्या केंद्रात मंत्रीपदी आहे. महिला आणि बालविकास यासह अल्पसंख्यांक मंत्रालय सांभाळणाऱ्या स्मृती इराणी नुकत्याच सुशांत सिंगची (Sushant Singh Rajput) आठवण काढत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सुशांत सिंगने आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी सुशांत सिंगची आठवण काढली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. यावेळी त्यांनी सुशांत सिंगच्या आत्महत्येची माहिती कळताच आपण अभिनेता अमित साधला (Amit Sadh) फोन केला होता अशी आठवण सांगितलं. त्यांना अमित साध असाच काहीतरी मूर्खपणा करेल अशी भीती व्यक्त केली होती.

The Slow Interview मध्ये निलेश मिश्रा यांच्याशी बोलताना स्मृती इराणी यांनी सुशांत सिंगची आठवण काढली. 14 जून 2020 ला सुशांत सिंगने आत्महत्या केली होती. यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ माजली होती. "ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला, त्या दिवशी मी एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. त्याठिकाणी अनेक लोक होते. पण मी काहीच करु शकले नाही. मी सगळं थांबवा असं सांगितलं. त्याने मला फोन का केला नाही असं वाटत राहिलं. त्याने मला फोन करायला हवा होता. मी त्याला तू स्वत:ला संपवू नकोस असं सांगितलं होतं," असं स्मृती इराणी यांनी सांगितलं.

स्मृती इराणी यांनी यावेळी आपण सुशांतला ओळखत होतो असं सांगितलं. सुशांतला आपण शेजारील सेटवर काम करताना पाहिलं असल्याने ओळखत होतो. मी माहिती आणि प्रसारण खातं सांभाळत असताना त्याला शेखर कपूर यांच्यासह IFFI स्टेजवर मास्टरक्लाससाठी आमंत्रित केलं होतं अशी माहिती स्मृती इराणी यांनी दिली. 

सुशांत सिंगच्या निधनानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला होता. "माझ्याकडे काही शब्द नाही. अशाप्रकारे तू जग का सोडलंस हे समजत नाही आहे. बालाजीमध्ये आलेला एक गुणी तरुण मुलगा ते स्टार असा मोठा प्रवास तू केला होतास आणि अजून बरा पल्ला तुला गाठायचा होता. तुझी आठवण येत राहील. तू फार लवकर गेलास," असं ट्वीट स्मृती इराणी यांनी केलं होतं. 

सुशांत सिंगसह 'काय पो छे' चित्रपटात काम करणाऱ्या अमित साधलाही स्मृती इराणी ओळखत होत्या. सुशांतच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी अमित साधला फोन केला होता. "मला भीती वाटत असल्याने मी अमित साधला फोन केला. मी त्याला फोन करुन कसा आहेस विचारलं. हा मुलगा काहीतरी मूर्खपणा करेल याची मला कल्पना होती. त्याने मला सांगितलं की, आता मला जगायचं नाही, या मुर्खान हे काय केलं. मला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. पब्लिसिस्ट रोहिनी अय्यरने मला सांगितलं की, मला भीती वाटत असून कोणीतरी त्याला शोधा," अशी आठवण स्मृती इराणी यांनी सांगितली.

यानंतर त्यांनी अमित साधला फोन केला. यावर त्याने तुमच्याकडे काही काम नाही आहे का सध्या? अशी विचारणा केली. मी म्हटलं, काम आहे, पण आपण बोलू. आम्ही सहा तास बोलत होतो असं स्मृती इराणी यांनी सांगितलं. 

अमित साध यानेही याआधी सुशांतच्या मृत्यूनंतर आपली मानसिक स्थिती योग्य नव्हती आणि स्मृती इराणी यांनी आपल्याला फार मदत केली असल्याचं सांगितलं होतं. चेतन भगत यांच्या पॉडकास्टवर त्याने सांगितलं होतं की "मी अडचणीत आहे हे त्यांना कसं कळलं माहिती नाही. त्यांच्याकडून मला अचानक फोन आला आणि आम्ही सहा तास बोलत होते. मी त्यांना आता मला या इंडस्ट्रीत काम करायचं नाही, मी पर्वतांमध्ये जाऊन राहतो असं सांगत होतो".