'महाविकासआघाडी'मध्ये या नेत्यांना मिळणार मंत्रिपदं!

राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Nov 21, 2019, 04:06 PM IST
'महाविकासआघाडी'मध्ये या नेत्यांना मिळणार मंत्रिपदं! title=

नवी दिल्ली : राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करतील हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका होत आहेत. या बैठकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईला येणार आहेत.

मुंबईला आल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते शिवसेना नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रमाबद्दल माहिती दिली जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे महाविकासआघाडीचं सरकार येण्याचं ठरत असतानाच आता मंत्रीमंडळातल्या संभाव्य नेत्यांची नावं समोर येऊ लागली आहेत. ३३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्रीपदापैकी कॅबिनेट मंत्रिपदात समसमान फॉर्म्युलासाठी आग्रही राहण्याचं काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना सांगितल आहे.

महाशिवआघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आग्राही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते, तर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं समजतंय.

राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणयाची चिन्हं आहेत.