तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती

२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Updated: Mar 23, 2019, 11:28 AM IST
तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती title=

नवी दिल्ली : भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगतिले. मे महिन्यापासून १८ महिने तिर्थयात्रेला जाण्यासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. उमा भारती यांनी मी २०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.  

५० वर्षीय उमा भारती यांनी लोकसभा २०१९ निवडणूक न लढवण्यामागचं कारण स्पष्ट केले आहे. 'मी २०१६ मध्येच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे. जर मी निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. मी माझा मतदारसंघ कधीही बदलू शकत नाही. तेथील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानत असल्याचे' उमा भारती यांनी म्हटले आहे. पुढे दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमा भारती यांनी २०२४ मध्ये निवडणूक लढवेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शानदार बहूमत मिळवेन असंही त्या म्हणाल्या. आगामी निवडणूका न लढवण्याची माहिती भाजपा महासचिव रामलाल यांना दिली होती. रामलाल यांनी उमा भारतींना तीर्थयात्रेसाठी जाण्याआधी पक्षासाठी प्रचार करण्याबाबत सांगितले होते. 'पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी ५ मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार असल्याचे' उमा भारतींनी सांगितले.  

२००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाने काँग्रेसचे दहा वर्षांचे सरकार पाडले होते. त्यानंतर त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. परंतु एका प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रं हाती घेतली होती. यादरम्यान उमा भारतींनी नव्या 'भारतीय जनशक्ती' पक्षाची स्थापना केली होती. मात्र काही दिवसांनंतर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला.