Unlock 4 : रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग

मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत रेल्वे मंत्रालय   

Updated: Sep 1, 2020, 04:59 PM IST
Unlock 4 : रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : CORONAVIRUS कोरोना व्हायरसच्या संकटात लागू करण्यात आलेल्या अनलॉक ४.० ची सुरुवात सप्टेंबरच्या १ तारखेपासून झाली. याच धर्तीवर केंद्राकडून काही महत्त्वाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. ज्याच्या अंमलबजावणीसही सुरुवात झाली. अनेक व्यवहार धीम्या गतीनं का असेना, पण पूर्वपदावर येत असतानाच बहुप्रतिक्षित अशी रेल्वेसेवा पूर्वपदावर येणार तरी कधी हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

रेल्वे रुळावर आणण्यासाठी आता संबंधित मंत्रालयाकडूनही हालचाली केल्या जाण्याचं चित्रं आहे. सूत्रांचा हवाला देत 'झी न्यूज'नं दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालय लवकरच १०० रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय़ घेऊ शकतं.  त्यासंबंधीचा एक प्रस्तावही रेल्वे मंत्रालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवत यासाठीती परवानगी मागितली आहे. गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखवताच अधिकृतपणे या रेल्वे गाड्या सुरु करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. 

सध्याच्या घडीला रेल्वे मंत्रालयाकडून जवळपास १२० रेल्वे गाड्या सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि देशात लागू असणारे निर्बंध पाहता ही परवानगी गरजेची आहे. 

रेल्वे सेवा काही प्रमाणात पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे विभागातर्फे राज्या-राज्याशी समन्वय साधण्यात येणार आहे. ज्यानंतर कोणत्या शहराला किती रेल्वे फेऱ्यांची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यात येईल. याबाबतच आढावा घेतल्यानंतरच रेल्वे सेवा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय़ होईल. पुन्हा एकदा देशातील बहुतांश भाग रेल्वे मार्गानं जोडण्यालाच यावेळी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

 

येत्या काळात सणासुदीच्या दिवसांचं सत्र सुरु होणार आहे. परिणामी रेल्वे सेवांच्या मागणीत होणारी वाढ पाहता हा मोठा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. त्यात अनलॉकच्या नव्या टप्प्यामध्ये शिथिलतेचं प्रमाणही वाढवण्यात आलं आहे. तेव्हा आता अनेकांकडूनच ही रेल्वे सेवासुद्धा पुन्हा रुळावर येण्याबाबतची आशा व्यक्त करण्यात येत आहे.