विद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद

उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली

Updated: Apr 18, 2019, 12:09 PM IST
विद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद title=

प्रयागराज : काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यासाठी आणि धार्मिक गोष्टींसाठी चर्चेत असलेलं प्रयागराज पुन्हा एकदा चर्चेत आलंय. अलाहाबाद विद्यापीठातल्या पीसीबी हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याचं हत्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर पोलीस प्रशासनानं ताराचंद्र हॉस्टेलची झाडाझडती घेतली. प्रयागराजच्या अलाहाबाद विद्यापीठाच्या ताराचंद्र हॉस्टेलमध्ये पोलिसांना बॉम्ब बनवण्याच्या वस्तू सापडल्या आहेत. यानंतर पोलिसांनी हॉस्टेलच्या तब्बल ५८ खोल्यांना सील केलंय. अनेक गाड्याही पोलिसांनी जप्त केल्यात.

अर्धसैनिक दलाची मदत

यावेळी पोलिसांसोबत विद्यापीठाचे अधिकारीही उपस्थित होते. तब्बल तीन तास सुरू असलेल्या पोलिसांच्या झाडाझडतीमुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला होता तसंच तणावाचं वातावरणही पाहायला मिळालं. यावेळी, हॉस्टेलमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या काही जणांनाही बाहेर काढण्यात आलं. उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली.


अलाहाबाद विद्यापीठात 

कशासाठी बनवले जात होते बॉम्ब?

पोलिसांनी घेतलेल्या विद्यापीठाच्या झाडाझडतीत बनावट पिस्तुल, देशी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सुतळी आणि दारु जप्त करण्यात आली. यासोबतच शेकडोंच्या संख्येनं कूलर आणि इतर सामानही पोलीस प्रशासनानं जप्त केलंय. 

उच्च न्यायालयाला घ्यावी लागली दखल

अलाहाबाद उच्च न्यायालयानं विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये वाढत जाणाऱ्या गुन्ह्यांवर नाराजी आणि चिंता व्यक्त केलीय. उच्च न्यायालयानं पुढाकार घेऊन या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. २२ एप्रिल रोजी प्रमुख सचिव गृह, आयुक्त, डीएम आणि एसएसपी प्रयागराज यांच्या कारवाईचा अहवाल उच्च न्यायालयानं मागवलाय.


अलाहाबाद विद्यापीठात 

कशी आली घडना समोर?

रविवारी रात्री उशिरा अलाहाबाद विद्यापीठाच्या पीसीबी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रोहित शुक्ला या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठात तणावाचं आणि आक्रोशाचं वातावरण होतं. या घटनेनंतर हॉस्टेल परिसरात पोलीस दल तैनात करण्यात आलं.

मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आदर्श त्रिपाठी आणि इतर सहा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यांनीच रोहितची हत्या केल्याचा संशय व्यक्त केलाय. विद्यापीठातल्या गँगवॉरमध्ये रोहितची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.