विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदी सरकारमधील मंत्र्यांचा अजब सल्ला

विजय माल्ल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला मोदी सरकारमधील मंत्र्यांने दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2018, 05:40 PM IST
विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदी सरकारमधील मंत्र्यांचा अजब सल्ला title=
उजवीकडे ज्युएल ओराम

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर फरार मद्यसम्राट माल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. आता मोदी सरकारमधील एका मंत्र्यांच्या अजब सल्ल्यामुळे मोदींची डोकेदुखी वाढलेय. विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना असा भाजप नेते आणि केंद्रीय आदिवासी मंत्री ज्युएल ओराम यांनी दिलाय. आदिवासी बांधवांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी हा अजब सल्ला दिला.

विजय माल्ल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला देताना माल्ल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत स्मार्ट बना, असा सल्ला भोळ्या भाबड्या आदिवासींना दिला आहे. उरांव भागामध्ये आदिवासींसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ओराम यांनी हा सल्ला दिला. 

मल्ल्याने कितीही वाईट कामे केलेली असो, त्याने सगळ्यात आधी त्याचा उद्योग यशस्वी करुन दाखवला. त्याच्या सफलतेपासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. विजय माल्ल्या हा एक स्मार्ट माणूस आहे. त्याने आपल्याकडे बुद्धीमान माणसे नोकरीला ठेवली आणि नंतर बँका, सरकार आणि राजकारण्यांवर आपला प्रभाव पाडला. तुम्हाला हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं आहे, ओराम म्हणालेत.

आदिवासींना शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे. सगळे आदिवासी याचा फायदा उचलू शकतात. संधी मिळवण्यासाठी आपल्याला स्मार्ट बनावं लागेल, उद्योजक बनावं लागेल, माहिती मिळवावी लागेल आणि तीच आपली ताकद असेल, असं ओराम यांनी पुढे म्हटले. दरम्यान, माल्ल्याचा आदर्श घ्या, असा सल्ला दिल्याने भाजपवर टीका होत आहे.