विजय माल्ल्यापुढचे सगळे पर्याय संपले, महिन्याभरात भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्यापुढचे सगळे कायदेशीर पर्याय संपले आहेत.

Updated: May 14, 2020, 09:35 PM IST
विजय माल्ल्यापुढचे सगळे पर्याय संपले, महिन्याभरात भारतात प्रत्यार्पणाची शक्यता title=

नवी दिल्ली : बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्यापुढचे सगळे कायदेशीर पर्याय संपले आहेत. त्यामुळे पुढच्या २८ दिवसांमध्ये माल्ल्या पुन्हा भारतात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने माल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात यावं, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात जायला माल्ल्याला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता माल्ल्यापुढचे सगळे कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत.

भारत आणि इंग्लंडमधल्या करारानुसार आता इंग्लंडच्या गृहमंत्री प्रिती पटेल न्यायालयाचा आदेश अधिकृतरित्या प्रमाणित करतील आणि २८ दिवसात माल्ल्याचं प्रत्यार्पण होईल. त्यामुळे पुढच्या ३० दिवसांमध्ये माल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण व्हायची शक्यता भारतीय यंत्रणांनी वर्तवली आहे. 

६४ वर्षांच्या विजय माल्ल्याने भारतीय बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं आहे. विजय माल्ल्या मात्र आपण हे सगळं कर्ज फेडायला तयार असल्याचं सांगत आहे. मी १०० टक्के कर्ज फेडतो, पण माझ्यावरचे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी माल्ल्याने केली आहे. 

मागच्याच महिन्यात प्रत्यार्पणाविरोधातल्या खटल्यामध्ये मल्ल्याचा पराभव झाला होता. विजय मल्ल्या यांनी घोटाळा केल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्याचं न्यायालयाने २३ हजार शब्दांच्या निकालात म्हणलं होतं. 

'कोरोनाच्या आर्थिक पॅकेजबद्दल अभिनंदन, माझे पैसेही स्वीकारा', माल्ल्याची ऑफर