नगरमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Updated: Dec 30, 2018, 10:22 AM IST
नगरमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी title=

अहमदनगर: महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून परस्पर भाजपशी संधान साधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वत: ही घोषणा करण्याची शक्यता आहे. या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा संदेश समाजात गेला होता. या प्रतिमेमुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे चौकशी अहवालाची वाट न पाहता पक्षाने गेलेली पत परत मिळवण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना पक्षातून काढून टाकायचे ठरवले आहे. झी २४ तासकडे ही माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून आली आहे.

भाजपशी युती केली असती तर स्वबळाच्या भूमिकेला तडा गेला असता- शिवसेना
 

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना मतांची जुळवाजुळव करून पालिकेत आपला महापौर बसवेल, असा अंदाज होता. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.

नगरमध्ये भाजपकडून शिवसेनेला धोबीपछाड; राष्ट्रवादीशी युती करत महापौरपदावर कब्जा

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक नेत्यांच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून भाजपशी युती करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र, काही नगरसेवकांनी परस्पर निर्णय घेत भाजपशी हातमिळवणी केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरेसवकांना पक्ष नेतृत्वाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच भाजपला पाठिंबा देणे चुकीचे असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.