कोरेगाव भीमा खटला : आनंद तेलतुंबडे पोलिसांच्या ताब्यात

माओवाद्यांशी संपर्क असल्याचाही आरोप 

Updated: Feb 2, 2019, 07:37 AM IST
 कोरेगाव भीमा खटला : आनंद तेलतुंबडे पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई :  कोरेगाव भीमा प्रकरणी घेण्यात आलेल्या एल्गार परिषदांमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. विलेपार्ले येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यानंतर त्यांना आता पुण्याच्या दिशेने नेण्यात येत आहे. तेलतुंबडे यांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याची बाबही समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या तेलतुंबडेंना न्यायालयापुढे सादर करण्यात येणार असून, कारवाई पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. 

पुण्यातील सत्र न्यायालयाने शुक्रवारी तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र कोणत्याही बेकायदा कारवाईत आपण सहभागी झालो नसल्याचा आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंध नसल्याचा दावा तेलतुंबडे यांनी केला होता. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि  एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २१ डिसेंबरला त्यांची याचिका फेटाळून लावली होती. 

 

कोण आहेत आनंद तेलतुंबडे 

कोरेगाव भीमा हिंसाचारासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं असून, त्याचे अत्यंत गंभीर परिणाम झाल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. ज्यामुळे प्रा. आनंद तेलतुंबडे  घडवण्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय. आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत. 

दरम्यान या प्रकरणात 'आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतवण्यात आलंय, घटनेवेळी आपण गोव्यात होतो तसंच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत', असा दावा करत तेलतुंबडे यांनी प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता.