'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप

Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 29, 2024, 12:10 PM IST
'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप title=
अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले आरोप

Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्लॅन होता, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचं प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी माझ्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं होतं. आपण त्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली असती तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुरुंगात असते असा खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला आहे. इतकेच नाही तर अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा फडणवीसांचा कट होता असंही देशमुख म्हणाले आहेत. 

फोटो दाखवत आरोप

अनिल देशमुख यांना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही फोटो दाखवत फडणवीसांवर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत फडणवीसांवर आरोप केले. अनिल देशमुखांनी "तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं. समित कदम माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आले होते. समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. नगरसेवक नसलेल्या या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिलीय," असं म्हणत देशमुख यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा डाव

फडणवीसांवर गंभीर आरोप करताना अनिल देशमुखांनी, "राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मी समित यांनी आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तेव्हा सही केली असती तर उद्धव ठाकरे जेलमध्ये असते. फडणवीसांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता," असं खळबळजनक आरोप केला आहे. 

नक्की वाचा >> समित कदम आहे तरी कोण? त्याचा फडणवीसांशी काय संबंध? देशमुखांनी दाखवला दोघांचा फोटो

शिंदे पवारांविरुद्ध हेच वापरलं..

एवढ्यावरच न थांबता देशमुख यांनी हाच डाव फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरुद्ध वापरल्याचा दावा केला आहे. "हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झाला," असा धक्कादायक दावा देशमुखांनी केला. 

कदम यांचा खुलासा

दरम्यान, अनिल देशमुख यांनी कालच हे आरोप केले होते. त्यामुळे हे आरोप जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष असलेल्या समित देशमुख यांनी यापूर्वीच देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. "अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यांनी मी त्यांच्या घरी गेलो होतो याचा खुलासा केला आहे. पण त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही, त्यांनी मला बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो," असं कदम यांनी म्हटलं आहे. "तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती," असा खुलासा देखील कदम यांनी केला आहे. "त्यामुळे देवेंद्रजी फडवणीस यांचा या गोष्टीशी कोणताही संबंध नाही," असंही कदम म्हणाले.