राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने या घातल्या आहेत अटी

​Narayan Rane  News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. 

Updated: Aug 25, 2021, 08:50 AM IST
राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने या घातल्या आहेत अटी title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : Narayan Rane  News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना जिल्ह्या पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाव आणता येणार नाही. दरम्यान, राणे पहाटे मुंबईत पोहोचले. रात्री जामीन मिळाल्यानंतर ते रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पहाटे पाचच्या सुमाराला ते मुंबईत दाखल झाले आहेत.

राणे यांनी खटल्याशी संबंधित कोणालाही धमकावू नये!

तर दुसरीकडे भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणेंसह भाजप नेते मुंबईत परतले आहेत. 1-2 दिवसांत जनआशीर्वाद यात्रेचा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे..

 दरम्यान, राणे यांची जामीनावर सुटका झाली तरी त्यांना न्यायालयाने समज दिली आहे. राणे यांनी पुराव्यांशी छेडछाड करु नये, खटल्याशी संबंधित कोणालाही धमकावू नये. तसेच कोणावर दबाब आणू नये, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर 2021 रोजी हजेरी लावावी, तपासासाठी व्हाईस सँपल हवे असल्यास ते द्यावे, अशा अटी न्यायालयाने त्यांना घातल्या आहेत.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाडला आणण्यात आले. रात्री उशिरा न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळं ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील संघर्ष आणखीच पेटला आहे.

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई गाठली. न्यायालयात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे याही होत्या. भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणेंसह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत.एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा कधी सुरू करायची, याचा निर्णय होणार आहे. 

10 जणांना अटक

दरम्यान, नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी आक्रमक होत 10 जणांना अटक केली आहे. तर बारा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. भाजप कार्यालय तोडफोडप्रकरणी दीपक दातीर आणि शिवसेना कार्यालय दगडफेक प्रकरणी मुकेश शहाणे या दोन नगरसेवक  फरार झाले आहेत. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून भद्रकाली पोलिसांच्या दोन टीम दगडफेक करणाऱ्यांच्या शोधार्थ रवाना झाल्या आहेत.