बारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्‍य सरकारचा पवारांना जोरदार धक्‍का

 नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

Updated: Jun 12, 2019, 05:12 PM IST
बारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्‍य सरकारचा पवारांना जोरदार धक्‍का title=
संग्रहित छाया

पुणे : नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जलसंपदा खात्याने अध्यादेश काढल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे. नीरा डाव्या कालव्याच्या वादप्रकरणी राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्‍यानंतर महाजन यांनी बारामतीचे पाणी वळविण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, बारामतीचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आल्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

जलसंपदा खात्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अखेर शह दिला आहे. बारामतीला जाणारं नीरा देवधरच्या डाव्या कालव्याचं अतिरिक्त पाणी अखेर माढ्याकडे वळवण्याचा अध्यादेश जलसंपदा खात्यानं काढलाय. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी हे पाणी माढ्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. बारामतीला जाणारे अतिरिक्त पाणी आता माढा परिसराला मिळणार आहे.