'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?

Pankaja Munde :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Jun 1, 2023, 02:40 PM IST
'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ? title=

Pankaja Munde : भाजपमध्ये पंकजा मुंडे यांनी घुसमट होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आहे.  पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं सूचक विधान माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी खूप काम केले. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळत आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीने त्यांच्या वक्तव्यावरुन भाजपला टोला लगावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत यायचं असेल तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणालेत.

पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असेही त्यांनी याआधी बोलून दाखवले होते. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलेले जात होते. दरम्यान, नाराजी व्यक्त करताना त्यांनी भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच असल्याचे देखील म्हटले आहे. 

दरम्यान, दिल्लीत जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन सुरु आहे. यावर भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे  यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आता पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे, पण भाजप माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचेच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. या विधानावरुन त्या प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे.  

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची देखील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया देताना म्हटले, पंकजा यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्यांचे आज अस्तित्त्व काय उरलंय? राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घेतला तरच त्यांचे अस्तित्त्व टिकून राहील.