पंकजा मुंडे गेल्या तरी कुठे; पाहा कोणासाठी सोडला देश

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?  

Updated: Aug 31, 2021, 09:01 PM IST
पंकजा मुंडे गेल्या तरी कुठे; पाहा कोणासाठी सोडला देश  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या आणि कमी वयातच राजकारणाची खेळी अतिशय शिताफीनं खेळणाऱ्या पंकजा मुंडे (pankaja munde) या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्येही कमीच दिसत आहेत. 

विरोधी पक्षाला खडे बोल सुनावत आपल्या पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी दिवसेंदिवस मेहनत घेणारा हा चेहरा नेमका गेला कुठे असाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात आणि मुंडे समर्थकांच्या मनात घर करत आहे. हे सर्व वातावरण पाहता खुदद् पंकजा मुंडे यांनीच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

फेसबुकवर एक फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून आपण नेमके कुठे आणि का गेलो आहोत यावरुन पडदा उचलला. ‘हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?", असं म्हणत त्यांनी एक उलगडा केला. 

मुलांना जन्म देऊन सोडणाऱ्या अभिनेत्रीवर सरकारची मोठी कारवाई 

 

आपण अतिशय महत्त्वाची जबाबदारी निभावत असल्याचं त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. या भूमिकेत त्या कायमच रमतात, कारण त्यांची ही भूमिकाच तशी आहे. ही भूमिका आहे, ‘आई’ची. मुलगा परदेशात शिक्षण घेणार असल्यामुळं सध्या पंकजा मुंडेंनीही मुलाखातर परदेश गाठला आहे. तिथला अनुभव आणि देशाभिमानाची भावना त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?  
‘माझ्या आर्यमन च्या आई च्या रोल मध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस.. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे.. आर्यमन ची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही, 10 वी च्या परीक्षा चालू होत्या एकही पेपर च्या साठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणुन संपूर्ण वेळ त्याला देत आहे. म्हणुन कशावर काही टिप्पणी न करता बघते आहे राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी. तरीही इथे देखील घडले असे की मध्य प्रदेश च्या लोकांनी मला डाळ बाटी च्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोचले विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे.. त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले. खूप बोलले, अनेक कार्यक्रम ही ठरले. शेवटी इथे ही नाही म्हणाले तरीही बीजेपी च्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच !! पण part time कारण priority आर्यमन आहेच.. आज जन्माष्टमी साजरी होत आहे तिथे जात आहे. सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मध्य प्रदेश मधली 75 गाव smart करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.. लहान मुलानी आपल्या pocket money मधून 75 cents पासून 75 dollar पर्यंत रक्कम रोज 75 दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशन साठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना laptops किवा smartphone देण्याचा plan तयार केला आहे... अनेक अश्या गोष्टी पाहून मी आनंदी झाले, नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवा ही जिभेवर रेंगाळत आहे ... जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने. माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले.’